Nashik News : लोककलेतून जीवनमूल्ये जपण्याचे काम; ‘कलगीतुरा’चे लेखक दत्ता पाटील यांच्याशी संवाद

Artists of Nashik rehearsing Kalagitura play written by Datta Patil
Artists of Nashik rehearsing Kalagitura play written by Datta Patilesakal

Nashik News : जीवनमूल्य हरवले की लोक अस्वस्थ होतात आणि हेच मूल्य जपण्याचे काम पूर्वी लोककलेतून होत. लोककला जगण्याचे मूल्य शिकवतात. आता ही परंपरा लोप पावत असल्यामुळे त्यासोबत जीवनमूल्य नष्ट होत आहेत.

प्रामुख्याने १९९० नंतर लयास गेलेली अशीच एक लोककला म्हणजे ‘कलगीतुरा’ होय. लावणी, सवाल- जवाब, वगनाट्य यासारख्या लोककला जतन केल्या पाहिजे, असा संदेश घेऊन ‘कलगीतुरा’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे.

मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट अर्थात एनसीपीए या संस्थेने गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच मराठी नाटकाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्याचा बहुमान हा नाशिककरांना मिळाला. त्याबद्दल ‘कलगीतुरा’ चे लेखक दत्ता पाटील यांच्याशी साधलेला संवाद. (work of preserving life values ​​through folk art conversation with Dutta Patil author of Kalgitura Nashik News)

प्रश्‍न 'एनसीपीए' ही संघटना काय काम करते?

दत्ता पाटील : मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट अर्थात एनसीपीए ही संस्था चित्रपट व नाट्य विभागप्रमुख ब्रूस गुथ्री व कार्यक्रम विभागाच्या सहव्यवस्थापक राजेश्री शिंदे यांच्या नेतृत्वात काम करते.

या संस्थेने आजवर विविध भाषांमधील नाटकांची निर्मिती केली. या संस्थेत नाटकाची निवड व्हावी, हा फार बहुमानाचा भाग समजला जातो. मराठी नाटकाची प्रथमच निवड झाल्याचा आनंद वाटतो. ५ मेस या संस्थेतर्फे कलगीतुराचा पहिला प्रयोग सादर करण्यात येणार आहे.

प्रश्‍न : ‘एनसीपीए’मध्ये मराठी नाटक पोचण्यासाठी इतकी वर्षे का लागली?

श्री. पाटील : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, नाट्यलेखक कानेटकर यांच्यानंतर नाशिकमध्ये दर्जेदार नाटकांचे लेखन झाले नाही. व्यावसायिक रंगभूमीवर गाजतील अशी नाटके लिहिली गेली नाहीत. त्यामुळे नाशिकची नाट्य परंपरेत एक मोठी पोकळी निर्माण झाली. गेली २५ ते ३० वर्षे ही पोकळी कायम राहिल्यामुळे मराठी नाटकांना अपेक्षित यश मिळवता आले नसावे.

प्रश्‍न कलगीतुराची निवड कशी झाली?

श्री. पाटील: एनसीपीए या संस्थेने महाराष्ट्रातील नाट्य लेखकांकडून त्यांच्या संहिता मागवल्या होत्या. राज्यातून ५५ संहिता प्राप्त झाल्या. यात कलगीतुराही होती. वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांची कसोटी घेण्यात आली.

दिग्गज लेखकांनी त्याचे परीक्षण केले. साधारणतः वर्षभराच्या प्रक्रियेनंतर अंतिम नाटकाचे नाव जाहीर झाले.

प्रश्‍न : कलगीतुरा आहे तरी काय?

श्री. पाटील : पौराणिक, आध्यात्मिक लावण्या रचना यातून समाज प्रबोधनाचे काम लोकपरंपरा करत होत्या. ‘कलगी’ म्हणजे शक्ती आणि तुरा म्हणजे ‘शिव’ या सवाल जवाब सारख्या लोकपरंपरेतून आध्यात्मिक झगडा लोकांना बघायला मिळायचा.

त्यातून समाजप्रबोधन व्हायचे. पुराणातील, अध्यात्मातील कथा जनतेपर्यंत पोचविण्याचे ते माध्यम होते. देशी परंपरा या दुर्लक्षित होत आहेत, त्यांचे जतन व्हायला हवे, हा संदेश देणारे हे नाटक आहे. लावणी व लोकसंगीताच्या माध्यमातून त्याची मांडणी केली आहे. सचिन शिंदे हे दिग्दर्शक तर ऋषीकेश शेलार यांचे संगीत आहे. विशेष म्हणजे सर्व कलाकार नाशिकमधीलच आहेत.

प्रश्‍न: यापूर्वीही दर्जेदार नाटके लिहिली?

श्री. पाटील: पत्रकारिताक्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यामुळे नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्याकडे बघण्याची दृष्टी विकसित झाली.

यातून नाटकांचे समीक्षण करायला शिकलो आणि त्यातून पुढे नाट्यलेखन. २००१ मध्ये सेलिब्रेशन त्यानंतर मध्यम पदलोपी, ज्ञानिया, ब्लॅक आऊट, कस्टमर केअर, बगळ्या बगळ्या कवडी दे, कृष्ण विवर, हंडाभर चांदण्या, गढीवरच्या पोरी, दगड आणि माती, स्ट्रॉबेरी, संगीत देवबाभळी, राजहंस आणि आता कलगीतुरा हे नाटक लिहिले. यातील प्रत्येक नाटकाचे वेगळे वैशिष्ट्य राहिल्यामुळे त्यांना भरघोस पारितोषिके मिळाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com