
नाशिक : लेह-लडाखमध्ये घुमला दि. बा. पाटलांच्या नावाचा जयघोष
सर्वतीर्थ टाकेद (जि. नाशिक) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport) लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. भारतातील पर्यटनाचे आकर्षण बिंदू लेह-लडाख येथे दिनांक ५ ऑगस्ट रोजी एकत्र येत इगतपुरी येथील तरुणांनी दि. बा. पाटील यांच्या नावाचा बॅनर दाखवत त्यांच्या नावाचा जयघोष केला आणि लेह लडाखच्या कडेकपारीत दि. बा पाटील यांच्या नावाचा आवाज घुमला.
नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन वातावरण पेटले आहे, महाराष्ट्रात सत्ताधारी आणि स्थानिक ह्यांच्यातला वाद आता टोकाला पोहोचला आहे. सिडको भवनाला घेराव असो की महामार्गावरच आंदोलन सगळीकडे स्थानिक जनता आक्रमक होताना दिसत आहे. अशातच काल ५ ऑगस्ट २०२१ रोजी भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा जिथे राबता आहे अशा मोक्याच्या ठिकाणी लेह लडाख येथील डोंगर-दर्यांमध्या जाऊन इगतपुरीच्या तरुणांनी दि.बा.पाटीलांच्या नावाला समर्थन देणारा बॅनर उंचावत दि. बा. पाटिल यांच्या नावाचा जयघोष केला.
या मोहिमेमधे इगतपुरी तालुक्यातील नामवंत लोकांचा सहभाग आहे. गरजेच्या वेळी सदैव समाजाच्या मागे उभे राहणारे आणि मदतीला धावून जाणारे हे तरुण शक्य त्या सर्वच पद्धतीने समाज विकासाचा ध्यास घेऊन समाजकार्यासाठी अग्रेसर असतात. अशात लेह लडाख येथे जाऊन नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव द्यावे ही मागणी हिरीरीने देशासमोर मांडत, महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे असे सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले. या प्रसंगी ज्ञानेश्वर लहाने, प्रशांत कडू, विठ्ठल लंगडे, शंकर भगत, इगतपुरी तालुका सरपंच परिषद संघटनेचे मा पदाधिकारी हीरचंद्र चव्हाण,सदानंद आडोळे, दशरथ भागडे, योगेश भागडे, प्रवीण म्हसने,अमोल भागडे, नंदू कडू, नामदेव भागडे, अनिल चव्हाण, प्रकाश आडोळे, भाऊ भगत, रोहित चव्हाण, दर्शन कडू आदी आगरी समाजबांधव उपस्थित होते.