सोशल मीडियाच्या युगात देखील 'बोहाडा'मुळे पारंपरिक लोककलेला नवीन उभारी!

चांदोरी बोहाडा.jpg
चांदोरी बोहाडा.jpg

नाशिक : (चांदोरी) संगणकीय युगात मनोरंजनाची संकल्पनाच बदलली. सोशल मीडियामुळे तरुणाई हायटेक झाली. असे असले तरी पारंपरिक लोककला आजही जिवंत आहेत. मध्यंतरीच्या काळात त्या पूर्णतः लयास गेल्या होत्या. मात्र, अलीकड च्या दोन वर्षांपासून बोहाडा, गोंधळी, भारुड या लोककलांकडे माणसं आकर्षिले जात आहेत. आधुनिकतेचा टच या लोककलांनाही मिळू लागला असून, व्हॉट्‌सऍप, यूट्यूब च्या माध्यमातून त्याला झळाळी मिळू लागली आहे. 


रामायण, महाभारतावर आधारित कथेवरच सर्वाधिक बोहाडे लोकप्रिय 

पूर्वीच्या काळी मनोरंजनाचे साधने खूपच मर्यादित असल्याने लोककलाच आघाडीवर होत्या. राष्ट्रपुरुषांच्या कार्याची माहिती देखील जलसा या लोककलेतून जनसामन्यां पर्यंत पोचविली जायची. राज्यभर राष्ट्रपुरुषांवर आधारित कार्यक्रमांमध्ये हे जलसे होत असत. बोहाडा हा लोककलेतील मनोरंजनाची सर्वांत मोठी कला आहे. शेकडो वर्षांचा इतिहास असलेला बोहाडा यांत्रिक युगातही खानदेशमध्ये टिकून आहे. त्याचे स्वरूप बदलले असले तरी बोहाड्यातील कथा मात्र त्याच आहेत. रामायण, महाभारतावर आधारित कथेवरच सर्वाधिक बोहाडे लोकप्रिय झाले आहेत. अन्य कथांचाही बोहाड्यात समावेश केला जातो. 

बोहाडा 300 वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक 

उत्तर महाराष्ट्रमध्ये चांदोरी (ता. निफाड), अकोले (जि. नगर), लोणारवाडी (ता. सिन्नर), जानोरी (ता. दिंडोरी), मुखेड (ता. येवला) या ठिकाणचे बोहडा ऊर्फ आखडी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील दाभाडी, खडकी, खमताणे, कंधाणे, निकवेल, उमराणे, पिंगळवाडे, देवळा आदी ठिकाणी बोहाडेचे कार्यक्रम होतात. उत्तर महाराष्ट्रात किमान पन्नासपेक्षा अधिक गावांमध्ये ही परंपरा जोपासली जात आहे. काही ठिकाणी मोठ्या कालखंडानंतर ती पुन्हा सुरू होत आहे. बोहाडा 300 वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा उत्सव आहे. हा उत्सव आषाढ महिन्यात सुरवात होऊन साधारणतः 13 ते 15 दिवस असतो. अंगाला झोंबणारा गार वारा, गडद अंधारातही चैतन्यदायी प्रकाश देणारे टेंभे, संबळ, पिपाणी आणि डफ अशा पारंपरिक कर्णमधूर वाद्यांच्या तालावर लयबद्ध पदन्यास करीत नृत्य करणारी विविध देवदेवतांची सोंगे आणि शेवटी मोठ्या भक्तिमय वातावरणात निघालेल्या देवीच्या सोंगाची घरोघर पूजा करणारे ग्रामस्थ अशा आगळ्यावेगळ्या वातावरणात गेली अनेक वर्ष बंद असलेल्या आखाडी (बोहडा) उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये पुनरुज्जीवित झाली आहे. 

मशाली (टेंभे) पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचविले जातात

उत्सवाला रात्री सुरवात होते. देव-देवतांचे मुखवटे व वेश परिधान करून पारंपरिक वाद्य असलेले संबळ व पिपाण्यांच्या तालावरती मिरवणूक काढली जाते. काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली (टेंभे) पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचविली जातात. कागदाचा लगदा व जंगली झाडपाला वापरून देव-दानवांचे मुखवटे तयार केलेले असतात. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोंगं काढली जातात. त्यांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. जगदंबा व महिषासुराच्या युद्धात त्याचा वध करून विजयी जगदंबादेवीच्या मिरवणुकीने यात्रेची व कार्यक्रमाची सांगता होते. 


लोककलेतील बोहाडा ही कला आजही 25 ते 30 टक्के टिकून आहे. अलीकडे ती वाढू लागली आहे. रामायण, महाभारतावर आधारित कथांना अध्यात्मिक वारसा आहे. या कथांचे संवाद पूर्वापार लिहून तयार आहेत. ते संवाद कलावंतांचे तोंडपाठ आहेत. नवीन संवाद कोणी लिहीत नाही. त्यामुळे अन्य कथांपेक्षा या कथांवरच बोहाडे सादर केले जातात. - डॉ. सयाजी पगार, लोकसाहित्यिक, मालेगाव  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com