Dhule News : इतरत्र डाळिंब पिकावर तेल्याचा प्रादुर्भाव असला तरी काळगाव, बेहेडसह साक्री तालुक्यातील डाळिंबबागा आजतरी तेल्यामुक्त असल्याचा गौरव राहुरी कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ, डाळिंबतज्ज्ञ, पुणेस्थित उद्योजक डॉ. विनय सुपे यांनी व्यक्त केला. (Pomegranate orchards in Sakri taluka are telya disease free dhule news)
काळगाव, बेहेड (ता. साक्री) शिवारात फळ पिकातील डाळिंबावरील तेल्या रोग, पाणी व्यवस्थापन, बुरशीनाशक वापर, कीडरोग नियंत्रणाविषयी चर्चासत्रात ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते.
कृषिभूषण तथा काळगावचे लोकनियुक्त सरपंच संजय भामरे, जयराज तिजोरीवाला, संदीप भामरे, नितीन ठाकरे, विजय भामरे, सुनील भामरे, विश्वास पदमोर, अशोक पदमोर (हट्टी), गोपाळ खैरनार प्रकाश देवरे (म्हसदी), गोरख बेडसे (ककाणी), हेमराज ठाकरे, नरेंद्र भामरे (दारखेल), मनोज ठाकरे, छोटूराम तोरवणे (बेहेड) व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
डाळिंबबागांचे सूक्ष्म नियोजन करावे
तेल्यामुक्त डाळिंबबागांचे रहस्य काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केल्यावर केवळ डाळिंबबागांचे सूक्ष्म नियोजनच असल्याचे त्यांनी पटवून दिले. कारण वर्षभर वातावरणात बदल घडत असतात. अशा नैसर्गिक संकटावर मात करत शेतकऱ्यांनी धाडसी होत शेतीत संघर्ष केला तर येणारा काळ शेतकऱ्यांचा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रासायनिक खतांचा कमीत कमी वापर, सेंद्रिय खत शेती आणि जैविक कीटकनाशकांचा वापर केल्याने आज तेल्यामुक्त डाळिंबबागा उभ्या असल्याची माहिती कृषिभूषण संजय भामरे यांनी दिली. डांळिब फळझाडाची वाढ हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत चांगली होत असून, समशीतोष्ण व कोरडे हवामान असल्याने कायम दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना हे पीक वरदान ठरत आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
मात्र अशाही परिस्थितीत काही भागात तेल्या रोगामुळे डाळिंबबागा काढण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर येत असल्याचे चित्र आहे. यावर अनेक पर्याय उपलब्ध असल्याची माहिती डॉ. सुपे यांनी दिली. तेल्या रोगावर जैविक जीवाणूयुक्त औषधांचा वापर करत रासायनिक बुरशीनाशक कीटकनाशकांचा वापर टाळावा, असे आवाहन केले.
तेल्यासदृश परिस्थिती दिसल्यास शेतकऱ्यांनी न घाबरता बाजारातील अतिसंवेदनशील बुरशीनाशक वापरू नये. दोन फवारणींचे अंतर सात ते दहा दिवसांचे असावे. बागेत तेल्या दिसल्यास फवारणीचे प्रमाण कसे असावे अशा विविध टिप्स त्यांनी शेतकऱ्यांना दिल्या.
डाळिंब पिकास व्यवस्थापन महत्त्वाचे
अलीकडे पारंपरिक शेतीला छेद देत शेतकरी फळपीक व भाजीपाला शेतीकडे वळल्याचे चित्र आहे. सर्वच फळपीके नैसर्गिक आपत्तीला बळी पडत असल्याचे सांगत डॉ. सुपे यांनी पाणी व्यवस्थापन, वातावरणातील बदलामुळे होणारे विविध कीडरोगांच्या नियंत्रणासाठी करावयाचे नियोजन याविषयी मार्गदर्शन केले. तथापि, या भागातील शेतकरी शेती व्यवसायात सजग असल्याचे समाधान व्यक्त केले. कमी पाणी, मुरमाड जमिनीतही आव्हान स्वीकारून फळबागा उभ्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनी काळानुरूप बदल करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.