राज्यात तीन महिन्यांत 20 लाख बालकांचे होणार लसीकरण; आजाराकडे दुर्लक्ष बेततेय जिवावर
नाशिक - राज्यात सर्वाधिक बालमृत्यू कुपोषणाने होतात. त्यापाठोपाठ अतिसारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अतिसारामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या बालकांमध्ये 40 टक्के बालके रोटा व्हायरसने ग्रस्त असतात. अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूला तटबंदी घालण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला राज्यात प्रारंभ करण्यात आला. येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यातील किमान 20 लाख बालकांना ही लस दिली जाणार आहे.
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये आजही नदी, पावसाळी ओहोळ-नाले, विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. मात्र, पावसाळ्यात वाहून येणारे पाणी मातीतील अनेक रसायने वाहून मिश्रित होते. परिणामी, तेच पाणी लहान बालकांच्या पिण्यात आल्यामुळे त्यांच्या नाजूक प्रकृतीवर विपरीत परिणाम होतो आणि त्यांना उलट्या, जुलाब यांसारखा त्रास सुरू होतो. ही अतिसाराची लागण झाल्याने बहुतांश वेळा वेळेत उपचार न मिळाल्याने बालकांचा मृत्यू होतो.
रोटा व्हायरस म्हणजे काय?
14 आठवड्यांच्या आत असलेल्या लहान मुलांना अतिसाराची लागण झाली असेल, तर त्यांच्यात 90 टक्के बालके ही रोटा व्हायरसग्रस्त असतात, असे निष्कर्षातून समोर आले. प्रदूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाब होऊन अतिसाराने बालके दगावतात. यालाच रोटा व्हायरस, असे संबोधले जाते. केंद्र सरकारने "रोटासील' या नावाने लस उपलब्ध करून दिली आहे. "सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' या संस्थेने रोटासील लसीची निर्मिती केली आहे. ही लस बाळांना तोंडावाटे वा सीरिंजद्वारे (इंजेक्शन) देता येते. यापूर्वी ही लस फक्त खासगी रुग्णालयांमध्ये दिली जात असे. अत्यंत महागडी लस असल्याने आणि बालमृत्यूला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागानेच मोफत लसीकरण मोहीम हाती घेतली.
रोटा व्हायरस लसीकरण मोहीम सुरू करण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयांतर्गत वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नियमित लसीकरण मोहिमेत समाविष्ट केल्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये ती उपलब्ध आहे.
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक
|