मेलो तरी तुम्हाला त्रास देणार नाही; तुम्ही फक्त आम्हाला सोडा साहेब...!

worker
worker

शिरपूर : आम्हाला तुमचं पाणी नको, सेवाही नको... आम्हाला फक्त घरी जाऊ द्या...प्रवासात आम्ही मेलो तर सहकारी विल्हेवाट लावतील... तुम्हाला कोणतीच तोशीस देणार नाहीत... फक्त आम्हाला येथुन सोडा साहेब..! अशी आर्जव करीत बिजासनी घाटात शेकडो मजूर काल दिवसभर उभे होते. रात्री उशिरापर्यंत प्रवासाची परवानगी न मिळाल्याने त्यांचा संयम सुटला आणि शेवटी मध्यप्रदेश-उत्तर प्रदेश शासनाच्या निषेधाच्या घोषणांनी महामार्ग दणाणून गेला.
सलग चौथ्या दिवशी बिजासनी घाटात हजारो मजूर अडकले. हे मजूर पुढे जाण्याची परवानगी मागत होते. महाराष्ट्र शासनाने आम्हाला कुठेच रोखले नाही. मग तुम्ही वाट का अडवता अशी विचारणा मजुरांनी मध्य प्रदेशच्या अधिकाऱ्यांना केली. उत्तर प्रदेशमध्ये परतणाऱ्या मजुरांना मनाई आहे. त्यामुळे हे मजूर पुन्हा मध्यप्रदेशाकडे परततात. सीमावर्ती भागात त्यामुळे पेचप्रसंग तयार होतात. ते टाळण्यासाठी मध्यप्रदेशच्या सीमेवरच मजुरांना अडवण्याचे धोरण स्वीकारण्यावाचून पर्याय नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

समन्वयाचा अभाव
गेल्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर मजुरांना रोखल्यानंतर त्यांच्या संतापाचा उद्रेकाच्या घटना घडत आहेत. दररोज हजारो लोकांची सोय लावतांना अधिकारी मेटाकुटीस आले आहेत. आत्तापर्यंत मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, संघटनाही आता थकल्या आहेत. महाराष्ट्राचे धोरण स्पष्ट असतांना मध्यप्रदेश शासन आणि प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे मात्र, हजारो कुटुंबांचा जीव टांगणीला लागत आहे.

दिवसा विश्रांती, रात्री प्रवास
पहाटेपर्यंत चालायचे, दिवसा शेतांच्या कडेला झाडाच्या सावलीत, बंद ढाब्यांच्या आडोशाला विश्रांती घ्यायची आणि दिवस मावळताच पुन्हा पाय ओढत पुढे निघायचे असा या मजूर कुटुंबांचा दिनक्रम झालाय. अपघाताची भिती कायम असतेच. मुंबई ते बिजासनपर्यंतच्या प्रवासात महामार्गलगतच्या वस्त्यांमध्ये शुकशुकाट दिसतो पण काही मोजकी मंडळी त्यांच्या जेवणासह विश्रांती, पाण्याची सोय करते असे मजूरांनी सांगितले.

मरण्यापेक्षा ते बरे...
गावी गेल्यावर स्वागत होणार नाही, खाणाऱ्या तोंडात आणखी भर पडली म्हणून त्रागाच होईल, कमाई बंद झाली म्हणून तिरस्कारही केला जाईल पण, मुंबईत बेवारस मरण्यापेक्षा गावाच्या मातीत दोन दिवस बहिष्कृतासारखे घालवले तर हरकत काय ? अशी भावना मजूरांमध्ये आहे.

अधिकाऱ्यांवर रात्रपाळीचाही भार
स्थलांतरित मजुरांसाठी रात्री-बेरात्री महामार्गावर जाणे स्थानिक अधिकाऱ्यांना भाग पडत आहे. काल रात्री उशिरापर्यंत प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन, महसूल मंडलाधिकारी संजय जगताप आदी सेंधवा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बिजासनी घाटात थांबून होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनामध्ये व्यस्त असतांनाच अधिकाऱ्यांवर बिजासनी घाटातील रात्रपाळीचा भार पडत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com