डी.एड महाविद्यालयांना 'कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी ?

_teacher.jpg
_teacher.jpg

नाशिक/ तळवाडे-दिगर :  नोकरीची हमखास शाश्वती समजल्या जाणाऱ्या डी. एड अभ्यासक्रमांकडे गेल्या तीन ते चार वर्षापासून भावी गुरुजींनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. कारण तीन वर्षापासून राज्यातील तब्बल १४८ महाविद्यालयांमध्ये एकही प्रवेश नाही. तसेच गेल्या तीन ते चार विनाअनुदानित,अनुदानित जवळपास ७५० पेक्षा जास्त  महाविद्यालय  बंद पडले आहेत. त्यामुळे राज्यातील डी. एड. महाविद्यालयांना अखेरची घरघर लागली आहे. यंदादेखील ५५ हजार ६४४ पैकी केवळ १७ हजार ९८१विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे 'कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी' असे म्हणण्याची वेळ या महाविद्यालयांवर आली असून येत्या काळात अजून अनेक महाविद्यालयात टाळे लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. 
    

राज्यातील डी. एड. महाविद्यालयांना घरघर    
 राज्यात २०१०-११पर्यंत डी.एड.ची पदवी मिळताच तात्काळ शिक्षकाची नोकरी मिळत होती. शिकाची नोकरी मिळाली की हमखास आर्थिक स्थैर्य मिळत होते. त्यामुळे लाखो विद्यार्थी बारावी परीक्षा झाल्यानंतर लगेचच डी.एड. कडे प्रवेश घेण्यासाठी गर्दी करत होते. परंतु राज्यात २०१२ पासून शिक्षक भरतीला बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे डी. एड करून नोकरीची कोणती संधी उपलब्ध होत नव्हती  तसेच पदविका मिळाल्यानंतरही टीईटी सक्तीची करण्यात आली. तीन ते चार वेळा ही परीक्षा होऊनही कोणालाही नोकरी मिळाली नाही. त्यानंतर अभियोग्यता चाचणी घेण्यात आली त्यानंतर यंदा अत्यल्प शिक्षकाच्या जागा भरण्यात आल्या. त्यामुळे डी.एड करून काहीच उपयोग होत नसल्याने भावी गुरुजींनी डी.एड अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली आहे. 
      

येत्या काळात अनेक डी. एड. महाविद्यालये बंद पडण्याची आशंका

राज्यात २०१०-११ मध्ये अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढलेला ओढा पाहून अनेक अनुदानित व विनाअनुदानित अशी महाविद्यालय निघाली होती. यामध्ये शासनाची १६ महाविद्यालय,९५ खाजगी अनुदानित महाविद्यालय, तर मुंबई महानगरपालिकेची २ महाविद्यालये,आणि तब्बल ७२३ विनाअनुदानित महाविद्यालय असे एकूण ८३६ महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच २ अनुदानित तर १४५ विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये देखील एकही प्रवेश झालेला नसल्यामुळे दिसून आले. त्यामुळे डी. एड. महाविद्यालयांना घरघर लागली असून येत्या काळात अनेक डी. एड. महाविद्यालय बंद पडतील यात शंकाच नाही. 


डी.एड उमेदवारांवर उपासमारीची वेळ 

गेल्या नऊ वर्षानंतर चालू वर्षी झालेल्या शिक्षक भरतीत अत्यंत अल्पशा प्रमाणात शिक्षकांची पदे भरण्यात आली. मात्र गेल्या नऊ वर्षात लाखो उमेदवारांनी शिक्षक पदविका मिळविली आहे. ग्रामीण भागातील शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणारे शिक्षक आपली उपजीविका भागविण्यासाठी मजुरी करीत आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो उमेदवारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक डी. एड महाविद्यालयाना टाळे लागत आहेत. 

यंदाची प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
 

 महाविद्यालये     ८३६
 उपलब्ध जागा    ५५४४६
 प्रवेशित विद्यार्थी  १७९८१
 रिक्त जागा        ३७६६३


प्रतिक्रिया 

गेल्या दहा वर्षात खाजगी तसेच शासकीय शिक्षक भरती नाही गेल्या दहा वर्षात लाखो पदवीधारक पदवी घेऊन नोकरी अभावी रिकामी असल्याने अनास्था वाढली त्यामुळे ह्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे
 - डॉ. संजय काळोगे
 (प्राचार्य महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय,नाशिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com