विहिरींनी गाठला तळ, टँकरही फिरकेना! 

chalisgaon
chalisgaon

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी  आठ दिवसापासुन पाण्याचे टँकर बंद असल्याने अभोना गावासह तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.या  पाणीटंचाई संदर्भात प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.दरम्यान तांड्यावर आठ दिवसांत सात विवाह सोहळा पार पडल्याने या लग्नसोहळयाला विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. 

अभोणे गावात व तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.आजुबाजूच्या शेतातून पाणी आणावे लागते.अभोणे गाव व तांडा हे कळमडू ग्रामपंचायतीच्या अंतर्गत दोन्ही येतात. तांड्याजवळच्या ग्रामपंचायतीच्या विहीरीला पाणी नसल्याने नळच येत नाही.

लग्नाला पाणीटंचाई ग्रहण 
अभोणे तांडा येथे आठ दिवसांत सात विवाह सोहळा नुकताच पार पडले.या विवाह सोहळ्यांना विकतचे पाणीक्षघ्यावे लागत आहे. तांडा वस्तीलगतच्या काही विहिरींना पाणी आहे. मात्र, ज्यांची आहे, त्यांनाही टंचाई भासेल यामुळे ते भरू देत नाही. जे काही जण भरू देतात परंतु विनवण्या कराव्या लागतात. यामुळे पन्नास रुपये खर्च करून दोनशे लिटर पाणी येथील ग्रामस्थांना विकत घ्यावे लागते. यामुळे आता विकत पाणी पिण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने पाणी विकत घेण्याची वेळ तांडावासीयांवर आलेली आहे.एका लग्नासाठी दहा  हजार लिटर टँकरचे पाणी  लागत आहे.विवाहसोहाळा पाण्याअभावी पुढे ढकलावा लागत आहे.

टँकरचा पाणीपुरवठा बंद
अभोणे गाव व  तांडा येथील पाणीटंचाई संदर्भात पंचायत समितीकडुन पाण्याचे  टँकर सुरू करण्यात आले होते.आठ दिवसापासून प्रशासनाने येथील दोन्ही गावाचे टँकरचे पाणी बंद करून टाकले आहे. त्यामुळे तांड्यावर व गावात पाण्यासाठी महिलांना  एक ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.या दोन्ही ठिकाणी प्रशासनाने अचानक पाण्याचे टँकर बंद का केले? असा प्रश्न आता  ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.पाण्याच्या शोधासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे. अभोणे गाव व तांड्यावर प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात आशी मागणी होत आहे. 

हातपंपावर चोवीस तासात भरतात दोनच हंडे 
अभोणे गावात दोन हातपंप आहेत. यातील एक बंद आहे. तर दुसरा सुरू असला तरी दिवसभरात त्याला केवळ हंडे पाणी येत असल्याचे ग्रामस्थांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यामुळे दोन हंडे पाणी भरण्यासाठी या हातपंपावर ग्रामस्थांच्या भांड्यांची लांबलचक रांग लागलेली असलते. अजून मे महिना जायचा असल्याने यापेक्षाही गंभीर परिस्थिती होण्याची वाट न पाहता, प्रशासनाने अभोणेकरांची पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, अशी आर्त मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

महिला म्हणतात... 
प्रशासन दखलच घेत नाही 
कविता पाटील सरपंच :- अभोणे गाव व तांड्यावरील पाण्याचे टँकर प्रशासनाने अचानक बंद करून टाकले.लगेचच आम्ही बंद टँकर सुरू करण्यासाठी गटविकास अधिकारी यांना या संदर्भात पञ पाठवले.प्रशासनाने या पञाची कुठलीही दखल घेतली नाही.यामुळे आज दोन्ही ठिकाणच्या महीलांसह ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.प्रशासनाने येथील पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवावा. 

पाण्यासाठी रोजंदारी बुडवावी लागते 
वंदना राठोड ः आमच्याकडे कुठलेच वाहन नाही.कामाला गेली तरच पोटाला खायला मिळेल, अशी परिस्थिती आहे. सध्या पाण्यासाठी रोजंदारी बुडवावी लागत आहे.पाणी भरतांना विहिरीत पडण्याची भीती असते.कोणाचा तरी जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का? 

दिवसभर पाण्याचाच विचार असतो 
सुरेखा चव्हाण : मी माहेरी आली असून मला सुद्धा पाण्यासाठी शेत शिवारात पायपीट करीत जावे लागत आहे.घरात पाणी नसल्याने कोणत्याच कामात चित्त लागत नाही. दिवसभर पाण्याचाच विचार असतो. पाण्यासाठी महिलांचेच जास्त हाल होत असतात. एवढी गंभीर समस्या निर्माण झालेली असतांना प्रशासनाने टँकर बंद का केली.

अभोणे तांड्यावर मी नुकताच जावून आलो.कोणीही पाण्याची समस्या मांडली नाही.या दोन्ही ठिकाणी पाण्याची काय अडचण आहे.त्यासंदर्भात माहीती घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात येतील. 
- अतुल पाटील, गटविकास अधिकारी चाळीसगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com