
भाजपनं अखिलेश यादवांविरोधात वातावरण कसं तयार केलं? समजून घ्या
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election Result) भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. पण, यावेळी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचे भाजपसमोर जोरदार आव्हान असल्याचं बोललं गेलं. तरीही भाजपने दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशची सत्ता मिळवली. पण, भाजपनं (BJP) अखिलेश यादव यांच्याविरोधात नेमकं कसं वातावरण तयार केलं? हे आपण समजून घेऊयात.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अखिलेश यादव यांनी मुस्लीम लीगचे नेते आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांची भाजपचे सरदार वल्लभबाई पटेल यांच्यासोबत तुलना केली होती. असं वक्तव्य करून अखिलेश यांनी भाजपला आयतं कोलीत दिलं होतं. २०१३ मध्ये कैराना येथील कवाल हत्याकांडात जवळपास ६२ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ४० हजरांपेक्षा अधिक लोक निर्वासित शिबिरांमध्ये गेले होते. त्यामुळे येथील जाट-मुस्लीम समीकरण बिघडलं होतं. त्याचा फायदा भाजपला २०१७ च्या निवडणुकीत झाला. परिणामी पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपने ७१ पैकी ५२ जागांवर ताबा मिळविला होता. या निवडणुकीत भाजपला संपूर्ण पश्चिम उत्तर प्रदेश ताब्यात घ्यायचं होतं. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी कैरानाकडे जास्त लक्ष केंद्रीत केलं होतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीपूर्वी कैरानाला जात ८ वर्षांपूर्वी पलायन केलेल्या लोकांना घरात परत आणले. तसेच त्यांनी तत्कालीन समाजवादी पक्षाच्या सरकारवर हल्लाबोल केला होता. इथं तालिबानचं सरकार चालणार नाही, असा निशाणा योगींवर समाजवादी साधला होता.
कैराना येथील खटल्याप्रकरणी अनेक वर्ष तुरुंगात असलेल्या नाहिद हसनला उमेदवारी देण्याच्या समाजवादी पक्षाच्या हालचालीमुळे भाजपला आरोप करण्याची चांगली संधी मिळाली. त्याचाच फायदा घेत भाजप खासदाराने कैराना या मुस्लीम बहुल प्रदेशातून गुन्हेगारांच्या धमक्या आणि खंडणीसारख्या प्रकाराला कंटाळून गाव सोडल्याच्या ३४६ लोकांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर २०१२ मध्ये समाजवादीच्या सरकारने लखनौ, राममंदिर आणि वाराणसीतील संकट मोचन मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींवर झालेले खटले कसे परत घेतले? हे सांगून भाजपने आणखी समाजवादीविरोधात वातावरण तयार केलं. त्यानंतर २००८ मधील दहशतवादी हल्ल्यातील दोषी मोहम्मद सैफचे वडील शाहबाद याच्यासोबत अखिलेश यादव यांचा फोटो समोर आल्यानंतर भाजपने अधिक आक्रमकपणे अखिलेश यांच्यावर टीका केली.
समाजवादी यादवांचा वर्चस्व असलेला पक्ष असल्याची टीका भाजपकडून वारंवार केली जात होती. त्यानंतर अखिलेश यांनी वडील मुलायमसिंह यादव यांचा मतदारसंघ असलेल्या करहलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपच्या आरोपांना अधिकच बळ मिळालं. अखिलेश यांना फक्त त्यांच्या कुटुंबीयांवर आणि एका विशिष्ट जातीवर विश्वास असल्याची टीका भाजपने केली. अखिलेश यांनी हे नवीन समाजवादी पार्टी असल्याचं जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण, भाजपनं त्यांचे प्रयत्न वेळोवेळी हाणून पाडले.
Web Title: Up Assembly Election Result How Bjp Atmosphere Against Akhilesh Yadav Samajwadi Party
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..