UP Assembly Election
UP Assembly ElectionSakal

UP Election: साखरपट्ट्यात सप - भाजपत कमालीची कटुता..!

साखर पट्ट्यात शेतकरी हत्याकांडाने भाजपचा गोडवा हरपला

लखीमपूर : चौथ्या टप्यात निर्णायक ठरणाऱ्या साखर पट्ट्यात शेतकरी हत्याकांडाने भाजपचा गोडवा हरपला असून समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये कमालीची कटुता दिसत आहे. केंद्रातील मोदी आणि राज्यातील योगी सरकारने योजनांचा जोरदार भडिमार केलेला असला तरी शेतकरी हत्याकांडाचा प्रभावात या योजनांच्या प्रचाराचा अभाव आहे.

उत्तर प्रदेशातील सर्वाधिक नद्या आणि पाण्याचा प्रदेश म्हणून लखीमपूर खेरीची ओळख आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडले त्या तुकिनिया या गावाकडे जाताना दोन्ही बाजूला उसाचे फड अन् सोन्यासारख्या पिवळ्या चमकीने राईची शेती फुललेली दिसते. शारदा, शरयू, घागरा, गोमती, चाऊका, मोहना, खताना, कोरीयाल या नद्यांनी हा प्रदेश पाणीदार बनवला आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक नऊ साखर कारखाने असल्याने रस्त्यावर उसाच्या गाड्या अन ट्रकची रेलचेल आहे.

मौर्य, शीख, कश्यप, कूर्मी, चौहान अन वर्मा या जाती लखीमपूर जिल्ह्यात प्रभावी आहेत. शेती लहान अन् पाण्याने वेढली असल्याने येथील शेतकरी रोजंदारी करण्यावरच अवलंबून आहे. मजुरांची संख्या सर्वाधिक असल्याने योगी सरकारने गॅस आणि रेशनची योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली आहे. तर, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सर्वाधिक घरांचे लाभार्थी या जिल्ह्यात दिसतात. एकट्या सिंगाई नगरपरिषदेत तब्बल १५०० गरिबांना या घरांचा लाभ मिळाला आहे. या गावात फिरताना अत्यंत टुमदार घरे उभारल्याचे नजरेस पडते. पिढ्यान् पिढ्यांचे छप्पर हटून सुसज्ज अशी दुमजली घरकुलं लोकांनी उभारल्याचे नगरसेवक जोगिंदकुमार साख्य याने दाखवले.

या योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रभाव दिसत असला तरी शेतकरी हत्याकांडाने लहान मोठे शेतकरी, शेतमजुरांची नाराजी मोठी आहे असे बजरंग गोयल या व्यापाऱ्याने कबूल केले. गोयल हे स्वतः भाजपचे समर्थक आहेत. पण यावेळी भाजपचे आमदार शशांक वर्मा यांच्यासमोर आव्हान असल्याचे त्यांनी मान्य केले. जिल्ह्यात आठ विधानसभा आहेत. सध्या भाजपकडे आठ तर, समाजवादी पक्षाकडे दोन असून यावेळी दोन्ही पक्षात तुंबळ रस्सीखेच दिसून येत आहे.

कुत्ते नही भोंकते नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या या जिल्ह्यात योगी सरकारच्या अगोदर गावागावात चोऱ्या होत असल्याचे शिवम कश्यप हा स्थानिक पत्रकार सांगत होता. त्यामुळे रात्रभर गावात कुत्री भुंकत असत. पण गेल्या चार वर्षांत गावागावात आता रात्री कुत्री भुंकत नसल्याचे लोक गमतीने म्हणतात. कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा झाल्याचे हे चित्र भाजपसाठी दिलासादायक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com