नागपूर : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालित कळमना मार्केटमध्ये असमाजिक तत्त्वाच्या व्यक्तीकडून आलू, कांदे आणि फळांसह कृषी उत्पन्नाच्या चोरीच्या घटनेत सतत वाढ होऊ लागली आहे. दररोज लाखो रुपयाच्या मालाची चोरी होत असून त्याला शेतकरी अथवा व्यापाऱ्यांनी विरोध केल्यास धारदार शस्त्र दाखवून धमकाविण्यात येते. याबाबत व्यापारी आणि शेतकऱ्यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रारही केली. मात्र, तोडगा काढण्यात न आल्याने आज शनिवारी काही असमाजिक तत्त्वाच्या व्यक्तींकडून मोसंबीची चोरी केल्याने संतप्त झालेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ जोरदार नारे निदर्शने करीत आंदोलन केले. दरम्यान, कळमना येथील ठाणेदार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेश भुसारी यांच्या निलंबित करण्याची मागणी केली.
पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या आशीर्वादामुळे शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेल्या मालाची चोरी होत असल्याचा आरोप व्यापारी आणि शेतकऱ्यांनी अनेकदा केला आहे. तरीही त्यावर निर्बंध आणण्यात येत नाही उलट असामाजिक तत्त्वाचे व्यक्ती मार्केट परिसरात बिनधास्तपणे शस्त्र घेऊन प्रवेश करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच जनता भीतीयुक्त जीवन जगत आहे. त्यात व्यापारी जिवाची पर्वा न करता शेतात पिकवलेला माल विक्रीसाठी बाजारात आणत असताना त्यांना अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उत्पादित केलेल्या पिकांची विक्री कुठे करावी असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे.
चोरीच्या घटना फक्त फळ बाजारातच होते असे नाही तर येथील आलू, कांदा, भाजी, मिरची, धान्य या बाजारातही नियमित असे प्रकार होतात. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. धान्यगंज अडतिया मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबरला बाजार समितीच्या समस्यांबाबत सचिवांची भेट घेतली. चोरीच्या प्रकाराबाबत सांगितले. मात्र, कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने आजचा प्रकार घडला. व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर समितीचे सचिव राजेश भुसारी आणि कळमना ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, व्यापाऱ्यांनी भुसारी यांनी फळाच्या बाजारातील हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मागणी केली. सोबतच कृषी मालाची चोरी झाल्यास जेवढ्या मालाची चोरी होईल तेवढ्याच मालाची भरपाई बाजार समितीने द्यावी अशी मागणी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.