मौजमजा करताना ‘ते’ बनले नावाडी, हाकली नाव आणि स्वतःचा ठरले कर्दनकाळ...

काटोलः मौजमजा करण्यासाठी गेलेले मित्र याच प्रकल्पात बुडाले. त्यांचा शोध घेताना गावकरी.
काटोलः मौजमजा करण्यासाठी गेलेले मित्र याच प्रकल्पात बुडाले. त्यांचा शोध घेताना गावकरी.

काटोल/जलालखेडा (जि.नागपूर): सध्या काटोल, नरखेड तालुक्यात पाऊस सुरू असल्यामुळे तलाव, धरणे ‘ओव्हरफ्लो’ होत आहेत. डोंगरदऱ्यातील गर्द वनराजीत निसर्गाचा आनंद घेण्याचा मोह तरुणांना आवरला नाही. निसर्गरम्य वातावरणात रिधोरा येथील जांब प्रकल्प परिसरात फिरायला जाण्याचा आणि पोहण्याचा या हिरव्या ऋतूत कुणालाही मोह होतो. दरवर्षी येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते. सध्या कोरोना परिस्थितीत बाहेर जाता येत नसल्यामुळे याठिकाणी सहसा कुणी फटकत नाही. परंतू काटोल तालुक्यातील रिधोरा जांब प्रकल्प येथे मित्रांसह मौजमस्ती करायला गेलेल्या दोन तरुण मित्रांचा पाण्यात जाण्याचा हट्ट मात्र त्यांच्या जिवावर बेतल्याची घटना गुरूवारी घडली.

ओढविले जीवघेणे संकट
जांब प्रकल्पात फिरायला गेलेले दोन तरुण बुधवारी सायंकाळी बुडाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुडालेल्या तरुणांत राकेश वसंत खरपकर (वय३५,भिष्णूर), कुणाल विलास धोटे(वय३५,खुशालपूर) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत असलेल्या तरुणांनी बुडाल्याची ओळख दिली. ते दोघे तरुण नावाडी नव्हते, ते हौसेमौजेकरिता हा उपद्व्याप करीत होते. मौजमजा करताना ते स्वतःच नावाडी बनल्याने त्यांच्यावर हे जीवघेणे संकट ओढविले.

नाव अनियंत्रित झाली व घडली घटना
सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीनाले अगदी भरभरून वाहत आहेत. रिधोरा येथील जांब प्रकल्प कालपासून ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने पर्यटक संधी पाहून हळूहळू गर्दी करू लागले होते. असाच प्रकार खुशालपूर व भिष्णूर येथून आलेले सात ते आठ मित्र दुपारी जांब प्रकल्पावर पिकनिकसाठी पोचले. अथांग पाणी पाहून त्यांना मोह आवरला नाही. त्यातील काही मित्र काठावर असलेल्या नावेत मौज म्हणून  बसले. नाव काही दूर गेल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात नाव अनियंत्रित झाली. दोघांनाही पाण्यात पोहणे जमले नाही व प्रकल्पाच्या पाण्यात ते अक्षरशः ते बुडाले. आरडाओरड केल्यानंतरही त्यांना पाण्याबाहेर काढणे कुणालाच जमले नाही. दोघेही रात्री उशिरापर्यंत हाती लागले नाही. पाण्यात बुडालेल्या मित्रांसोबत सुखरूप असलेले तुषार धोटे, शैलेश कोठे, अमोल कोठे, मयूर धोटे (सर्व खुशालपूर), अनिल नागमोते (दिंदरगाव) युवक काटोल तालुक्यातील असल्याची माहिती रिधोराच्या पोलिस पाटलांनी दिली. पोलिसांना ही माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडालेले  दोघेही तरुण नरखेड तालुक्यातील असल्याने संपूर्ण तालुक्यात स्मशानशांतता पसरली आहे. दोन्ही तरुण होतकरू आणि खासगी कंपनीत कामाला होते. त्यातील एकाचे लग्न झाले असून त्याला सहा महिन्याचे तान्हे बाळ असल्याची माहिती आहे.

संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com