या शहरातील पोलिस झाले आक्रमक; नऊ जणांवर दाखल केले गुन्हे, हे आहे कारण...

complaint will be filed against person for not wearing mask
complaint will be filed against person for not wearing mask

नागपूर : कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहे. याच धर्तीवर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांनी आक्रमक भूमिका घेत मास्क न वापरणाऱ्यांवर नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. ही राज्यातील पहिलीच कारवाई असल्याची माहिती आहे. 

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाउनसह संचारबंदी कायदाही लागू करण्यात आला आहे. मात्र, अनेक जण या कायद्यांचे वारंवार उल्लंघन करून पोलिसांची डोकेदुखी वाढवित आहेत. त्यामुळे संचारबंदीचा कायदा मोडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

मास्क वापरण्याची सक्‍ती शासनाने केली आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून हा नियम पाळणे सर्वांना गरजेचे होते. मात्र, अनेक जण मास्कचा वापर न करताच घराबाहेर पडत असल्याचे लक्षात येताच ठाणेदार खराबे यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. मास्क न वापरण्याचा राज्यातील पहिला गुन्हा नागपुरातील एमआयडीसी ठाण्यात दाखल करण्यात आला. सायंकाळपर्यंत नऊ जणांवर मास्क न वापरण्यासंदर्भात गुन्ह्यांची नोंद स्टेशन डायरीमध्ये घेण्यात आली. 

पोलिस मास्क न वापरणाऱ्यांना ताब्यात घेत असल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली. त्यामुळे केवळ एमआयडीसीच नव्हे तर शहरभरात अनेकांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली. ठाणेदार खराबे यांच्या कारवाईमुळे शहरभरात सकारात्मक बदल तीन तासांत बघायला मिळाले. या कारवाईचे पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्‍त रवींद्र कदम आणि डीसीपी विवेक मासाळ यांनीही कौतुक केले आहे. 

न्यायालयाने ठोठावली शिक्षा

शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या फार मोठी असल्याचे लक्षात येताच ठाणेदार खराबे यांनी कारवाई करण्याचा सपाटा लावला. एवढेच नव्हे तर खराबे यांनी नागपूर शहर पोलिस दलात सर्वाधिक कारवाई केल्या. केवळ कारवाई करूनच ते थांबले नव्हे तर त्यांनी हातोहात आरोपपत्र (चार्जशिट) तयार करून न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने त्यांच्या कारवाईला सार्थक ठरवित झटपट निकाल दिले. तीन दिवसांपूर्वी 12 जणांना तर गुरुवारी 22 जणांना संचारबंदीत फिरणाऱ्या रिकामटेकड्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली. संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणात राज्यातील ही पहिलीच शिक्षा आहे, हे विशेष... 

स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरा 
नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने मास्क वापरणे अतिशय गरजेचे आहे. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरावे. संचारबंदीत फिरणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे असून, न्यायालयाने आम्ही केलेल्या कारवाईची गांभीर्याने दखल घेतल्याबद्दल न्यायालयाचे आभार. 
- हेमंतकुमार खराबे, 
ठाणेदार, एमआयडीसी पोलिस स्टेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com