कारखान्याचे दूषित पाणी, तरिही संथ वाहते ‘वेणा’ माई !

हिंगणाः कारखान्यातील दूषित पाण्यामुळे प्रदूषित झालेली हिंगण्याची वेणा नदी.
हिंगणाः कारखान्यातील दूषित पाण्यामुळे प्रदूषित झालेली हिंगण्याची वेणा नदी.

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर): खरे तर हिंगणा नगरीचे नैसर्गिक वैभव म्हणजे ‘वेणा’नदी. संपूर्ण नगरीला आलिंगण देऊन नदीने तिच्या काठावरील गावांना समृद्धी बहाल केली आहे. तिने काठावरील गावांना ऐतिहासिक, भौगोलिक वारसा दिला असताना आज तिच्यातून वाहणाऱ्या प्रदूषित पाण्याने तिला अवकळा आली आहे.  एमआयडीसीतील अनेक कारखान्यांतून नाल्यात दूषित पाणी वर्षानुवर्षे वेणा नदीत वाहत आहे. या पाण्यामुळेच हिंगणा येथील वेणा नदी प्रदूषित  झाल्याचे दिसून येते. पाणी सर्रास एमआयडीसीतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातच सोडले जात असल्याने ही समस्या दिवसेंदिवस जटील रूप धारण करीत आहे. एमआयडीसीने पुढाकार घेऊन फिल्टर प्लॉंन्ट उभा करावा आणि कंपनीतून वाहणारे पाणी फिल्टर करुनच नाल्यात सोडावे, अशा प्रतिक्रिया जनता व्यक्त करीत आहे.

 हिंगण्याच्या जनजीवनावर परिणाम
सर्वात जुनी असणारी हिंगणा एमआयडीसी अत्यावश्यक सेवा देण्यास अपुरी पडली आहे. ७० वर्षे लोटल्यानंतरही कारखान्याचे दूषित पाणी दिवसरात्र नाल्यात सोडते, हे जगजाहीर आहे. एमआयडीसी प्रशासनाला याची कल्पना आहे. तरी यावर उपाययोजना करण्यात कमी पडली असल्याने आता याची झळ गावखेड्यात पोहचली आहे. नदीकाठच्या गावातील विहिरींचा दूषित पाण्यामुळे उपसा थांबला आहे. यासाठी आता ठोस उपाययोजना करणे गरजेचे झाले असल्याचे तालुका महामंत्री विकास दाबेकर म्हणाले. मागील अनेक वर्षांपासून दूषित पाण्याची समस्या उभी ठाकली आहे. माजी मंत्री बंग साहेबांकडे अनेक तक्रारी आल्या. त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. पण एमआयडीसी प्रशासनाने लक्ष दिले नाही. कारण एमआयडीसीला स्वतंत्र अधिकार आहे. कारखानदाराना कुठल्या सोई पुरवायच्या, समस्या कुठलीही असो त्यांची भूमिका महत्वाची असते. आता हे दूषित पाणी हिंगणा येथील वेणा नदीत जमा होते आणि अनेक गावांना याचा फटका बसतो. हे पाणी शेतीलाही देण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे ‘सकाळ’ ने हाती घेतलेला मुद्दा महत्वाचा आहे. मी स्वागत करतो आणि रायपूरमध्ये सरपंच आमचाच आहे. तसा ठराव घेण्यास सांगतो आणि याचा पाठपुरावा करतोय. यासाठी जी मदत लागेल ती करण्यास तयार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी सांगितले.

मासेमारांना न्याय कोण देणार?
वेणा नदी ही संगमापासून तर खडकी, गुमगाव मार्ग अनेक गावांना वेढा देऊन वाहते. यावर मोठ्या प्रमाणात मच्छीमार आपला व्यवसाय करुन पोट भरत होते. पण आता दूषित पाणी झाल्याने मासे जिवंतच राहत नाही. त्यामुळे त्यांचा रोजगार हिरावला. आता त्यांना मासे पकडण्यासाठी भटकावे लागते. जर याकडे शासन, प्रशासनाने लक्ष दिल्यास या नदीला जुने वैभव  प्राप्त होऊ शकते. यासाठी माझी जिथे गरज असेल तिथे मी आणि माझे व सहकारी मदत देण्यासाठी सदैव तयार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अनिल चानपुरकर म्हणाले. दूषित पाणी रायपूर येथे शेवटी जमा होते. स्मशानभूमीच्या पूर्वी नदी काठावर जागा आहे,तिथे फिल्टर प्लांन्ट चांगला उभा राहू शकतो. यासाठी मी स्वतः पुढाकार घेण्यास तयार आहे. ग्रामपंचायत रायपूर   तसा ठरावही घेऊ शकते. पण ही समस्या कायमस्वरूपी सुटावी. कारण हिवाळ्यात रायपूर येथील नाल्याच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना याचा आता त्रास वाढत असल्याचे रायपूरचे सरपंच प्रेमलाल भलावी यांनी सुचविले. दूषित पाण्यामुळे परिसरातील विहिरी, बोरवेलचेही पाणी दूषित झाले. त्याचा ताण नळयोजनेवर पडत आहे आणि तेही पाणी लोकांना पुरत नाही. त्यामुळे नाईलाजाने पाण्याचा वापर करावा लागतो. या पाण्यामुळे हाताला, अंगाला खाज येते. तसेच इतरही रोगांचा सामना करावा लागतो. नाग नाला आणि  वेणा नदीचा जिथे संगम होतो, तिथेच एमआयडीसीने फिल्टर प्लॉंट उभा करावा. यासाठी जर आंदोलन करावे लागले तरी आता जनता मागेपुढे पाहणार नाही असा इशारा कॉग्रेसचे जिल्हा महासचिव  शशिकांत थोटे यांनी दिला.

दुर्गंधीने गाठले शिखर.
झळ रायपूरमधील आमच्या हनुमान नगरातील जनतेला बसली आहे. रात्रीला परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. श्‍वास घेणे जड होते. त्यामुळे या परिसरात रोगराई  पसरते. मेहनतीने खोदलेल्या विहिरीचे पाणी पिण्यास योग्य नाही. भंयकर समस्यांशी सामना करावा लागतो. यासाठी एकच उपाय आणि तो म्हणजे हनुमान नगराच्या बाजूला वेणा नदीच्या संगमाजवळ सरकारी खाली पून असलेली जागा आहे, तिथे फिल्टर प्लॉंट लावावे. फिल्टर झालेले पाणी नदीत तसेच बाहेर वापरासाठी हनुमान नगरातील जनतेलाही द्यावे .असे झाल्यास वेणा नदीकावर बसलेल्या नागरिकांची यातून सुटका होइल.
-अजय घवघवे
युवा नेतृत्व
हनुमान नगर, रायपूर

गुरेढोरे मृत्यूच्या दाढेत
खडकी, कोथेवाडा, गुमगाव, वागधरा, टाकळघाट, सुमठांणा, गणेशपूर आणि इतरही गावांना तडाखा बसला आहे. गावातील नागरिक हैराण झाले आहे. गुरेढोरे येथील पाणी प्याल्याने जनावरे दगावली आहेत. प्रशासन जवाबदारी झटकत आहे. आता राज्यात सरकार बदलले आहे आणि ही समस्या कायम सुटण्यासाठी मी पुढाकार घेतो आणि पालकमंत्र्यांना वेणा नदीकाठी बसलेल्या गावांच्या भेटी तसेच पाहणी दौरा काढण्यासाठी मागणी त्यांच्याकडे करतो. प्रशासकीय दौर काढल्यास मंत्र्यासोबत एमआयडीसीचे अधिकारीही असणार आणि यातून मार्ग निघेल, अस मला वाटते. पण ‘सकाळ’ ने हा जिव्हाळ्याचा विषय घेतल्यामुळे ‘सकाळ’चे  अभिनंदन करतो.
-संजय जगताप  
कॉंग्रेस नेते
हिंगणा

प्रशासनाच्या दूरव्यवस्थेची भर
एमआयडीसीतील कंपन्यांचे पाणी आता हिंगणा येथील वेणा नदीत जमा होत आहे .चांगल्या पाण्याला हे दूषित पाणी खराब करीत आहे. त्यामुळे नदीकाठावरील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते . पहिलेच शेतकरी अनेक समस्यांना  तोंड देत असताना यातही प्रशासनाकडून दूरव्यवस्थेची भरच पडत आहे.
-डॉ.अजय पारधी
नगरसेवक, हिंगणा

संपादनःविजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com