दिवसा कष्ट, रात्री जागरण, कारण ठरतेय महावितरण!; नागपूर जिल्ह्यातील भयावह स्थिती

Danger of irrigation to farmers in the dark
Danger of irrigation to farmers in the dark

नागपूर : पीक जगविण्यासाठी शेतातील विहिरीला पाणी असले तरी वीज वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा दिवसांऐवजी रात्रीला साडेनऊ ते सकाळी सात वाजेपर्यंतच केला जातो. त्यामुळे दिवसभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी काळोख्यात रात्र काढावी लागते. झुडपी जंगल परिसरातील शेती शिवारात भटकणारे वन्यप्राणी, साप, विंचू आधीची पर्वा न बाळगता जीव मुठीत घेऊन सिंचनासाठी रात्र जागवावी लागते. अशावेळी ‘फ्युज’ गेलाच तर ते टाकायचे काम शेतकरीच करतात. एकंदरीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अत्यंत धोकादायक स्थिती झाली आहे.

सालई येथील आधुनिक पद्धतीने शेती करणारे सधन शेतकरी मनोज मिरचे सांगतात. २५ एकर शेतीमध्ये लागवडीखाली असलेले सोयाबीन पीक अतिपावसामुळे बुडाले आणि खोडकीड व बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचेही जबर नुकसान झाले.

रब्बीच्या पिकांची आस ठेवून हरभरा, गव्हाची लागवड केली. तलावाचा परिसर असल्याने रानडुकरे, रोही आदी वन्य प्राणी भटकतात. त्यामुळे रात्रीला ओलीतासाठी मजूर तयार होत नाही. पिके जगवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाल्याने दिवसा विद्युत पुरवठा मिळावा, यासाठी स्थानिक पुढारी व विद्युत विभागाला विनंती केली आहे.

स्थानिक काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निदान रब्बी हंगामात तरी दिवसाला वीज पुरवठा द्यावा, या मागणीसाठी सावनेर येथील विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांना निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय टाळल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला आहे.

शासन बदलले, वेळ नाही बदलली

विहिरीत व सिंचन प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असूनही महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे कोरडवाहू शेती करण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. शेतीसाठी रात्रीचा वीज पुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन पिकांचे ओलीत करावे लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे आरोप होत आहेत.

अनेकांनी गमावले प्राण

महावितरणाच्या सुलतानी धोरणामुळे सुरळीत वीज पुरवठा केला जात नसल्यामुळे तसेच रोहित्रामध्ये वारंवार बिघाड होते. आठवड्यातील तीन दिवस दिवसा आठ तास व रात्रीची दहा तास वीज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करून आपल्या जीवाशी खेळून रब्बी हंगामातील पिके जोपासावी लागतात. मागील काही वर्षांचा आढावा घेतला तर अनेक शेतकऱ्यांचा जिव रात्रीचे ओलीत करण्यासाठी गेला आहे. 

महावितरणने ‘शेड्यूल’मध्ये बदल करावा 
‘फ्युज’ गेल्यास जीव धोक्यात टाकून त्यांना ‘फ्युज’ टाकावा लागतो. यातच झुडपी परिसरात भटकणारे रोही, रानडुकरे आदी वन्यप्राणी आणि साप, विंचू अशा धोकादायक स्थितीमुळे महावितरण कंपनीने शेड्यूलमध्ये बदल करून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी दिवसाला वीज पुरवठा वाढवावा.
- गोविंदा ठाकरे,
शेतकरी व पंचायत समिती सदस्य

हिंस्र पशूंचा धोका
शेती ओलीत करीत असताना काळोख्या रात्रीला हिंस्र जनावराचे भय सदासर्वदा असते. कारण, विद्युत विभाग हा ग्रामीण भागात तीन दिवस दिवसाला तर तीन दिवस रात्रीला वीज पुरविते. त्यामुळे रात्रीला शेतीत ओलीत करीत असताना हिंस्र पशू केव्हा शेतकऱ्यांवर डाव साधेल याचा नेम नाही. जिवावर उदार होउन शेती सांभाळावी लागते.
- सागर सायरे,
शेतकरी, पारशिवनी

वृत्तसंकलन : मनोहर घोळसे, मनोज खुटाटे, रूपेश खंडार व मनीष दुर्गे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com