
नागपूर : गेल्या पाच वर्षात शहराचा वेगाने विकास झाला. परंतु हा विकास रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयुक्त तुकाराम मुंढेंची पाठराखण करीत आहेत. यात त्यांचे राजकारण असल्याचा आरोप आमदार प्रवीण दटके यांनी केला. जो अधिकारी मी म्हणेल तो कायदा, असे वागतो, त्याची पाठराखण करणे दुर्दैवी असल्याची पुश्तीही दटके यांनी जोडली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी नुकताच एका मुलाखतीत आयुक्त तुकाराम मुंढे यांची पाठराखण केली. यावरून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले. सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांच्या कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार दटके यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात अनियमितता केली, सभागृहातील निर्देश पायदळी तुडविले, विकासकामे रोखली, अशा आयुक्तांची पाठराखण करणे ही दुर्दैवी बाब असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री हे राज्याचे आहेत, त्यांनी उपराजधानीच्या विकासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. परंतु शहरातील विकासकामे थांबविणाऱ्या आयुक्तांच्या पाठीमागे असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी नागपूरचा विकास रोखण्याची भूमिकाच स्पष्ट केली.
शहरातील कॉंगेस आमदार विकास ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना दुसरी बाजू समजून घ्यावी, असे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निश्चितच दुसरी बाजूही पहावी. पालिकेची आर्थिक स्थिती यापूर्वीही वाईटच होती. परंतु, त्यावेळी असलेल्या आयुक्तांनी नियोजनातून शहराचा विकास साधला. गेली पाच वर्षे सोडली तर राज्यात राष्ट्रवादी-कॉंग्रेसची सरकार होती.
परंतु त्या काळातही शहराचा विकासाचा वेग कायम होता, याकडेही आमदार दटके यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी दुप्पट गतीने शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.