शाळा सुरू करण्याची घाई नको; डॉ. उदय बोधनकर यांनी केली ही मागणी...

Doordarshan should start an education channel
Doordarshan should start an education channel

नागपूर : दर दिवसाला कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्याची घाई राज्य सरकारने करू नये. कोरोना हा नवीन आजार आहे. कोरोना पालकांनाही अद्याप समजला नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संसर्गाचा धोका आहे. त्यातच स्थलांतरित कामगारांच्या मुलांपासून तर गरिबांच्या मुलांना शिक्षण आवश्‍यक असले तरी कोरोनाच्या संकटातून वाचवण्याची पहिली गरज आहे. शाळा सुरू करण्याची घाई केल्यास विद्यार्थ्यांना संसर्गाची भीती आहे. यामुळे 15 ऑगस्टनंतर शाळा सुरू करण्याचा विचार सरकारने करावा. या काळात दूरदर्शनवर शिक्षणवाहिनी सुरू करून सायंकाळी 5 ते 9 या वेळात शिक्षण पद्धतीत काही बदल करून ऑनलाइन शिक्षण सुरू करावे, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केले.

राज्यात कोविड-19च्या संकटासोबत राहण्याची सवय आता करावी लागणार आहे. मात्र, किमान वर्षभर तरी हे संकट अधिक भयावह आहे. या काळात शैक्षणिक वर्ष वाया जाता कामा नये, हे ठीक आहे. शिक्षण चालू राहिलं पाहिजे. मात्र, सध्याची कोरोना आणीबाणी बघता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोविडनंतरच्या शिक्षणावर तज्ज्ञांशी चर्चा करावी. दूरदर्शनवर शिक्षणवाहिनी सुरू करून 1 ली ते 4 थी आणि 5 वी ते 8 वी आणि 9 वी ते 10वी असे गट तयार करावे.

शिक्षणतज्ज्ञांशी, संस्थाचालकांशी आणि शिक्षकांशी चर्चा करून जूनमध्ये शाळा सुरू करण्याची घाई न करता 15 ऑगस्टनंतरच शाळा सुरू कराव्यात. तोपर्यंत विद्यार्थ्यांना कोविडच्या पार्श्वभूमीवर शिक्षण अभ्यासक्रम कसा असावा यावर चर्चा करावी. ऑनलाइन अभ्यासक्रम तयार करून दूरदर्शनवरील शिक्षण वाहिनीमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याची सोय करावी. पालकांच्या उपस्थितीत सायंकाळी हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्यास त्याचा लाभ अधिक होईल.

हेल्थ प्रोटोकॉल निश्‍चित करावा

कोविडनंतर नव्या शैक्षणिक वर्षाचा "हेल्थ प्रोटोकॉल' सरकारने निश्‍चित करावा. मोठ्या शाळेत हेल्थ प्रोटोकॉल ठरवण्यात येईल. मात्र, गरीब मुलं शिकणाऱ्या महापालिकेच्या तसेच खासगी संस्थेच्या, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना डिस्टस्निंग कसं सांभाळायचे हे मोठे आव्हान ठरणार आहे. यांच्यासाठी हेल्थ प्रोटोकॉल सरकारने तयार करून देण्याची गरज आहे. गरीब मुले सायकलरिक्षा किंवा ऑटोतून शाळेत येतील. दोन मुलांसाठी किंवा तीन मुलांसाठी ऑटो चालवणं शक्‍य नाही. सहा किंवा आठ मुलांना एकत्र ऑटोतून नेताना कोरोनाची संसर्गाची भीती कायमच राहणार आहे, असे डॉ. बोधनकर म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन सुरू करा
15 ऑगस्टनंतर 9 वी ते 10 वीतील विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करावे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात माध्यमिक शाळांमध्ये 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरू करावे. तिसऱ्या टप्प्यात 1 ते 4 या प्राथमिक शाळांचे किंवा कॉन्व्हेंटचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात शासनाने विचार करावा. तसेच मुलांवर ताण पडणार नाही, असा अभ्यासक्रम ऑनलाइन' तयार करावा. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांनाही ऑनलाइन प्रशिक्षण द्यावे. विशेष असे की, कोरोनाच्या काळात शाळा विलगीकरणासाठी वापरण्यात आल्या आहेत. त्यांचे निर्जंतुकीकरण करावे. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन सुरू कराव्यात.
- डॉ. उदय बोधनकर, कार्यकारी संचालक, कोम्हाड, युके.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com