एकदा का आपली वाईट वेळ आली की आपलं कोणी नसतं.... मुलं, नवरा, बायको कोणीही नाही

During the Corona period, the humanity of the citizens ended
During the Corona period, the humanity of the citizens ended

नागपूर : कोरोनामुळे जवळपात प्रत्येकाची माणुसकी संपली आहे. कोरोना संसर्गजण्य रोग असल्यामुळे यापासून आपला बचाव करण्यासाठी प्रत्येकजण धडपड करीत आहे. दुसऱ्यांची मदत तर सोडा कुटुंबीयही एक दुसऱ्यांच्या मदतीला धाऊन जात नाही आहे. याचे एक ना अनेक उदाहरण समोर आले आहेत. कुटुंबानीच एकमेकांची साथ सोडली असताना दुसऱ्यांकडून काय अपेक्षा करायची. म्हणूनच की काय अनेकांनी या काळात आपला धंदा सुरू केला आहे. कोरोनाच्या संकटाने खासगी रुग्णालयांपासून तर सरकारी रुग्णालयातील साऱ्यांची माणुसकी हरवल्याचा अनुभव नुकताच आला. याचे उदाहरण खालील प्रमाणे...

महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण?

टेकानाका येथील एका महिला रुग्णाला खासगी रुग्णालयांनी नाकारले. तब्बल १५ खासगी रुग्णालयांत खेटा घातल्यानंतरही दारातून तिला परत पाठविले. शेवटी मेयो रुग्णालयातील डॉक्टरांनी मेडिकलमध्ये रेफर केले. सकाळी सात वाजता मेडिकलच्या कॅज्युअल्टीसह बाह्यरुग्ण विभागात नेण्यात आले. परंतु, उपस्थित डॉक्टर तातडीने तपासले नाही. सकाळी सात वाजतापासून ११ पर्यंतचा वेळ गेला. अखेर भरती करण्यात आले. मात्र, ऑक्सिजन नसल्याने थांबावे लागेल, असे सांगितले गेले. अखेर ती महिला रुग्ण दगावली. असे प्रकार कोरोनाच्या काळात घडत आहेत.

५० हजारांत सोडला मृतदेह

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. परवा तालुक्यातील एका कोरोना रुग्णाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयातील बिल २ लाख ८९ हजार ६२८ रुपये इतके निघाले. मृत्यूपश्चात उरलेल्या १ लाख २४ हजार ६२८ रुपयांसाठी रुग्णालयाने मृतदेह देण्यास टाळाटाळ केली. शेवटी अति प्रयत्नांनंतर ५० हजार रुपये घेऊन मृतदेह अंतिम संस्कारासाठी रुग्णालयातून प्रशासनाच्या हाती देण्यात आला. सोमवारी ९१ बाधित रुग्णांसह एक बाधित मृताची भर पडल्याने तालुक्यात आता समूहसंसर्ग झाला की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. शेवटी या प्रकारामुळे पीडित कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

वडिलांचा मृतदेह स्वीकारण्यास मुलाने दर्शविली असमर्था

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्‍यातील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान कोविड रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. रुग्णालय प्रशासनाने एकुलत्या एक मुलाला वडिलांच्या निधनाची माहिती दिली. मृतदेह त्याच दिवशी सायंकाळी इर्विन रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता. मात्र, तीन दिवस लोटूनही अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेण्यासाठी मुलगा इर्विनमध्ये आलाच नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पित्याचा मृतदेह स्वीकारण्याची मुलाची मानसिकता दिसत नव्हती. पोलिसांनी आपल्या पद्धतीने समजवल्यानंतर मुलगा वडिलांचा मृतदेह स्वीकारण्यास तयार झाला. चौथ्या दिवशी सायंकाळी मुलगा काही लोकांना घेऊन इर्विनच्या शवागारासमोर आला. जन्म देणाऱ्या पित्यावर त्याच्या मृत्यूनंतर असा प्रसंग ओढविल्याबद्दल पोलिसांनी देखील दु:ख व्यक्त केले.

पतीचा मृत्यू कधी झाला हे पत्नीलाही समजले नाही

कामठीतील एका व्यक्तीची प्रकृती खराब झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना नागपुरात पाठविले. येथील डॉक्टरांनी कोरोना झाल्याचे सांगून रुग्णालयात घेण्यास नकार दिला. दुसऱ्या रुग्णालयात गेले असता पहिल्या डॉक्टरांनी उपचार न करण्यास सांगितले. असे चार रुग्णालयांच्या चकरा मारल्यानंतर पत्नी पतीला घेऊन मेडिकलमध्ये गेली. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे आपल्या पतीचा मृत्यू कुठे झाला असा प्रश्न पत्नीला पडला होता.

खासगी रुग्णालयात कुटुबीयांना सोसावा लागतो त्रास

प्रशासनाच्या वतीने कमी लक्षणे असलेल्या व नसलेल्यांसाठी घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत असले तरी चिंताजनक रुग्णांना व्हेंटीलेटरसाठी मात्र अजूनही पळापळ करावी लागत आहे. विनामास्क फिरणे, सॅनेटायझर्सचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे या सारख्या बाबींमुळे पटकन लोकांना संसर्ग होतो आहे. दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णालयातील बिलाचा भार आणि रुग्णांची होत असलेली गैरसोय यात कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे मत अनेक पिडित कुटुबीयांनी व्यक्त केले.

महापालिकेच्या कार्यप्रणालीवर संताप

५१ खासगी कोविड हॉस्पिटल तयार केल्यानंतरही रुग्णाला एक खाट उपलब्ध होत नाही. यावरून खासगी रुग्णालये आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांसोबत अशी अरेरावी सुरू असल्याचा आरोप नातेवाइकांकडून करण्यात येतो. त्यातच महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून योग्य माहिती मिळत नाही. यामुळे अनेक कुटुंबांकडून महापालिकेच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com