नागपुरात तडीपारांच्या बिमोडासाठी हवा ‘औरंगाबाद पॅटर्न; आरोपींवरचा गुन्हे शाखेचा वचक संपल्याची चिन्हे 

To end crime Aurangabad pattern have to implement in nagpur
To end crime Aurangabad pattern have to implement in nagpur

नागपूर ः शहरातील वाढत्या गुन्ह्यांचे निरीक्षण केल्यास अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार वारंवार गुन्ह्यात सहभाही होत आहे. यामध्ये तडीपार गुन्हेगारांची मोठी संख्या आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यातील कर्मचारी तडीपार आरोपींबाबत गंभीर नसल्यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढत आहे. नागपुरातील तडीपार आरोपींवर अंकूश ठेवण्यासाठी आता अमितेश कुमार यांच्या ‘औरंगाबाद पॅटर्न’ची गरज निर्माण झाली आहे. 

शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई पोलिस करीत असतात. सहा महिण्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत पोलिस गुन्हेगाराला तडीपार करू शकतात. या कारवाई केल्यानंतर त्या गुन्हेगाराला शहरात तसेच जिल्ह्यात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात येतो. त्याला अनिवार्य कारणास्तव शहरात यायचे असल्यास रितसर अर्ज करून पोलिस अधिकाऱ्याच्या परवानगीने प्रवेश करता येतो. 

परंतु, तडीपारीच्या काळात तो प्रतिबंधित क्षेत्रात पुन्हा दिसला तर त्याच्यावर पुन्हा मुंबई पोलीस ॲक्टनुसार अटक करून गुन्हा दाखल केला जातो. तडीपारीचा आदेश असूनही अनेक गुन्हेगार हे शहरात मोकाट फिरत असतात. रात्रीच्या वेळी अनेक गंभीर गुन्हे हे गुन्हेगार घडवीत असतात. खंडणी, मारहाण, धमकी, खून किंवा खुनाचा प्रयत्न अशा अनेक घटनांमध्ये यापूर्वी तडीपार गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले आहे. गुन्हे शाखेचा पाहिजे तेवढा वचक नसल्यामुळे तडीपार गुंड शहरात उजळ माथ्याने फिरत असल्याची चर्चा आहे.   

काय आहे ‘औरंगाबाद पॅटर्न’

अमितेश कुमार औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त असताना त्यांना तडीपार गुंडांना पकडल्यास तसेच ‘वॉंटेड’ आरोपींना अटक केल्यास थेट एक हजार ते १० हजार रूपयांचे बक्षिस घोषित केले होते. तडीपार गुंडाला अटक केल्यास पोलिस कर्मचाऱ्याला १० हजार रूपये तर वॉंटेड गुन्हेगाराला अटक केल्यास १००० रूपयांचे बक्षिस देण्यात येत होते. जर हाच पॅटर्न नागपुरात लागू केल्यास तडीपारांवर अंकूश ठेवता येणार आहे.

असाही एक प्रयोग

तत्कालिन पोलिस उपायुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी सर्वप्रथम तडीपार आरोपींचा बिमोड करण्यासाठी गांभीर्याने विचार केला होता. डॉ. भरणे यांनी शहरातील तडीपार गुंडांचे फोटोचे फलक चौकाचौकात लावले होते. त्यावर तडीपार गुंडाचा फोटो, माहिती आणि त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची नोंद केली होती. तसेच तडीपार गुन्हेगाराची माहिती देणाऱ्या नागरिकांना रोख बक्षिसही घोषित केले होते. त्यानंतर अनेक तडीपारांना शहर सोडून पळ काढला होता, हे विशेष.
 
तडीपारी कशी होते...

समाजाला घातक असलेल्या गुन्हेगारांची यादी स्थानिक पोलीस ठाण्यातून पोलीस उपायुक्तांना पाठवली जाते. ते ही यादी पडताळणीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्तांना पाठवतात. त्यानंतर चौकशी करून अंतिम अहवाल पुन्हा पोलीस उपायुक्तांकडे पाठवला जातो. उपायुक्त संबंधित व्यक्तीला बोलावून त्याला बाजू मांडण्याची संधी देतात. त्यानंतरच त्याला सहपोलिस आयुक्तांच्या सहीने तडीपार करण्याचा निर्णय घेतला जातो.

असा आहे कायदा...

समाजविघातक प्रवृत्तींना शहरातून तडीपार करण्यासाठी मुंबई पोलिस कायद्यात कलम ५५, ५६ आणि ५७ अन्वये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार तडीपारीची कारवाई केली जाते. ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीपासून लोकांना समाजात भीतीचे वातारण निर्माण होत असेल, त्यांच्यापासून धोका निर्माण होत असेल त्यांना कलम ५५ अन्वये, ज्यांनी मालमत्ते संदर्भात गुन्हे केलेले असतील, मारामारी, हत्येचे गुन्हे केलेले असतील त्यांना कलम ५६ अन्वये आणि जे दारू, काळाबाजारासंदर्भात गुन्हे केलेले असतील त्यांना कलम ५७ अन्वये तडीपार केले जाते. संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, जिल्ह्यातून आणि शहरातून त्याला तडीपार केले जाते. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com