रणजी सामन्यात कुणी लावली विदर्भाची नाव तिरावर! वाचा

file photo
file photo


नागपूर : कमी धावसंख्येचा (लो स्कोअरिंग) सामना नेहमीच आव्हानात्मक असतो. सामन्याचे पारडे कोणत्याही क्षणी इकडून तिकडे झुकू शकते. यजमान विदर्भ आणि मध्य प्रदेश संघादरम्यान 61 वर्षांपूर्वी व्हीसीए मैदानावर झालेल्या रणजी सामन्यात क्रिकेटप्रेमींना असाच काहीसा अनुभव आला. छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना विदर्भ चांगलाच अडचणीत सापडला. सुदैवाने गोसावी मदतीला धावून आल्याने विदर्भाची नाव किनाऱ्याला लागली. 


डिसेंबर 1959 मध्ये झालेल्या त्या तीनदिवसीय लढतीत विदर्भाच संघ डी. डी. देशपांडे यांच्या नेतृत्वात खेळला होता, तर मध्य प्रदेशचे कर्णधारपद चंदू सरवटेंनी भूषविले होते. विदर्भ संघात छल्ला नरसिम्हन, एस. ए. रहिम, व्ही. डी. गोसावी, एम. के. जोशी, एस. के. साहू, ए. एन. अभ्यंकर, के. व्ही. गिजरे, यू. कुमरे, एस. गणोरकर, एन. डी. बोकेसारखे नावाजलेले खेळाडू होते. मध्य प्रदेशचा संघातही सी. एन. नायडू, एम. आर. शर्मा, पी. सी. ब्रम्हो, एच. दळवी, एस. बॅनर्जी, एम. रवींद्र, एच. गायकवाड, ए. एस. भगवानदास, एल. श्‍यामलालसारखे त्या काळात दबदबा असलेल्या खेळाडूंचा समावेश होता. 

हेही वाचा  : लढाई जिंकली, पण युद्ध हरले!


"मॅटिंग विकेट'वर नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करणाऱ्या मध्य प्रदेशचा डाव विदर्भाच्या अचूक माऱ्यापुढे अवघ्या 186 धावांतच आटोपला. रहीम (पाच बळी) व गणोरकर (तीन बळी) या फिरकी जोडीने मध्य प्रदेशच्या एकाही फलंदाजाला चाळीशी गाठू दिली नाही. मध्य प्रदेशला कमी धावांमध्ये रोखल्याचा आनंद वैदर्भींच्या चेहऱ्यावरही फार काळ टिकला नाही. त्यांचाही डाव केवळ 190 धावांतच आटोपला. पहिल्या डावात चार धावांची निसटती आघाडी मिळविल्याचे तेवढेच एक समाधान होते. ही आघाडी मिळवून देण्यात सर्वाधिक 58 धावा काढणाऱ्या कर्णधार देशपांडे यांची मुख्य भूमिका राहिली. मोक्‍याच्या क्षणी अष्टपैलू रहीम यांचेही नाबाद 34 धावांचे योगदान महत्वपूर्ण ठरले. विदर्भाचे फिरकीपटू दुसऱ्याही डावात मध्य प्रदेशवर भारी पडले. रहिम (चार बळी) व गणोरकर (तीन बळी) यांनी पुन्हा अनुकूल स्थितीचा फायदा घेत पाहूण्यांचा दुसरा डाव 131 धावांत गुंडाळून विजयाचा मार्ग मोकळा केला. 

पडझडीनंतर लढवली खिंड 


विजयासाठी 128 धावांचे माफक लक्ष्य आणि अख्खा दिवस हातात. अशा परिस्थितीत निकाल कोणत्याही बाजूने लागणार होता. मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी जोशी (8), देशपांडे (3) व नरसिम्हन (0) यांना झटपट बाद करून विदर्भाच्या "ड्रेसिंग रुम'मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले. गोलंदाजांच्या मेहनतीवर पाणी फिरणार की काय असे वाटत असतानाच गोसावी संकटमोचक बनून संघाच्या मदतीला धावून आले. एका टोकाने पडझड सुरू असताना त्यांनी दुसऱ्या टोकाकडून खंबीरपणे खिंड लढवत विदर्भाला तीन गड्यांनी रोमांचक विजय मिळवून दिला. सलामीवीर गोसावींनी 67 धावांची "मॅच विनिंग' खेळी करत मध्य प्रदेशच्या आशेवर पाणी फेरले. रहीम यांनी दुसऱ्याही डावात नाबाद 22 धावा फटकावून आपले अष्टपैलूत्व सिद्‌ध केले. विजयानंतर विदर्भाच्या खेळाडूंनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला, तर हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यामुळे मध्य प्रदेशच्या खेळाडूंचे अवसान गळून पडले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com