सुदैवाने टळला दोन मुलींचा बालविवाह....वाचा सविस्तर 

Bal vivah
Bal vivah
Updated on

नागपूर : बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. काळ आधुनिक असला, तरी बालविवाहाच्या घटना कुठे ना कुठे घडतच असतात. अशाच दोन घटनांबाबत बालसंरक्षण कक्षाला माहिती मिळाली. बालविकास अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतल्याने अल्पवयीन मुलींचे लग्न थांबविण्यात आले. दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करून हमीपत्र लिहून घेण्यात आले. 

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्‍यातील कच्छीमेट तसेच उमरेड तालुक्‍यातील अशा दोन मुलींचा बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळाली. त्यावरून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्‍ताक पठाण यांना बालविवाह प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. जिल्हा बालसंरक्षण कक्षाची चमू गावात पोहोचली. ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण वैद्य यांच्याशी संपर्क साधण्यात आला. बालविवाह करीत असलेल्या कुटुंबांची भेट घेण्यात आली. 

यातील एका मुलीचे लग्न 28 मे रोजी तर दुसऱ्या मुलीचे लग्न 6 जून 2020 ला होणार होते. एक मुलगी साडेसोळा वर्षांची तर, दुसरी साडेसतरा वर्षांची आहे. 18 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलीचा विवाह होत असल्यास प्रतिबंधात्मक कारवाईची तरतूद असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच 18 वर्षे पूर्ण झाल्यावरच मुलीचे लग्न करणार, असे हमीपत्र लिहून घेण्यात आले. 

जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्‍ताक पठाण, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, संरक्षण अधिकारी साधना हटवार, ग्रामसेवक बाळकृष्ण वैद्य, सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय कुमरे, शिपाई श्री. बुटले, सरपंच धनराज अंबाडारे, अंगणवाडी सेविका शालू येसनसुरे यांनी कारवाईत सहभाग घेतला. 

असे केले समुपदेशन.... 
लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय 18 आणि वराचे 21 पेक्षा कमी असू नये, असे कायदा सांगतो. बालविवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत 18 वर्षे गाठायच्या आतच त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण, या साऱ्यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहत नाहीत. 

काय आहे शिक्षेची तरतूद... 
18 वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रुपये एक लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रुपये एक लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 

बालविवाह झाल्यास, संबंधित वर वा वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्रपरिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, वा जे अशा विवाहात सामील झाले होते अशा सर्वांना दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com