शेतकऱ्यांनो, तुम्हाला सोडणार नाही! मी पुन्हा येईल...

heavy rainfall again in vidarbha
heavy rainfall again in vidarbha

नागपूर : पुढील 48 तास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मोठे संकट घेऊन येण्याची दाट शक्‍यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने शनिवारी व रविवारी विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा "रेड अलर्ट' दिला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचाही इशाराही देण्यात आला आहे. पावसाच्या शक्‍यतेमुळे वैदर्भींना उन्हाच्या चटक्‍यांपासून थोडाफार दिलासा मिळणार असला तरी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. 

पूर्व व पश्‍चिम दिशेनेकडून येणाऱ्या हवेच्या विकोपामुळे मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याच्या तीव्र प्रभावामुळे पुढील दोन दिवस मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात पावसाळी वातावरण राहणार आहे. या काळात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांमुळे जोरदार वादळी पाऊस बरसण्याची शक्‍यता आहे. 

विशेषत: नागपूर, अकोला, वर्धा, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांनाही वादळाचा तडाखा बसण्याची शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या "रेड' व "ऑरेंज अलर्ट'मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर आणखी एक अस्मानी संकट उभे ठाकले आहे.

संभाव्य वादळाचा सर्वाधिक फटका गहू, चना, केळी आणि पालेभाज्यांना बसण्याची शक्‍यता आहे. दोन दिवसांनंतर उत्तरेकडील कोरड्या वाऱ्यांमुळे स्थिती हळूहळू "नॉर्मल' होणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. यावर्षी अवकाळी पावसाने विदर्भात चांगलाच कहर केला आहे. गेल्या आठवड्यातही गारपिटीने भंडारा व गोंदिया जिल्ह्यांना झोडपून काढले होते. 

शेतकऱ्यांसह नागरिकांना नाहक त्रास

यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने शेतकरी पार शिराश झाला होता. अनेकांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. मात्र, मधल्या काळात व पावसाळ्याच्या शेवटी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला होता. पावसाळ्याच्या शेवटी चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यातही मोठी वाढ झाली होती. मात्र, पाऊस सतत हजेरी लावत असल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अशातच पुन्हा विदर्भात पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. 

चटक्‍यांपासून मिळणार दिलासा

वरुणराजा यंदा विदर्भातून जाण्याच्या मुडमध्येच दिसत नाही आहे. दोन-चार दिवस गेले की हमखास हजेरी लावतो. आता पुन्हा हवामान विभागाने विदर्भात अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. पावसाच्या शक्‍यतेमुळे वैदर्भींना उन्हाच्या चटक्‍यांपासून थोडाफार दिलासा मिळणार असला तरी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com