वडेट्टीवार म्हणतात, विश्‍वास नसेल तर मी सारथीतून बाजुला व्हायला तयार!

Vijay-watteediwa
Vijay-watteediwa

नागपूर :  अधिकार, सत्ता यावरून आरोप-प्रत्यारोप राजकारण आणि राजकारण्यासांठी नवीन नाही. सध्या राज्याचे बहुजन कल्याणमंत्री असलेले विजय वडेट्टीवार यांच्यावर आरोपांची तोफ डागली जात आहे आणि निमित्त आहे त्यांचे सारथीचे प्रमुखपद.

सारथीच्या निमित्ताने त्यांच्यावर केलेल्या आरोपांविषयी त्यांना छेडले असता, "सारथी'च्या माध्यमातून राजकारण केले जात आहे. नको ते बिनबुडाचे आरोप करून वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी ओबीसी समाजाचा असल्याने मराठ्यांवर अन्याय करतो, असे म्हणणे सर्वार्थाने चुकीचे आहे. मराठा मुक्ती मोर्चाचा विश्‍वासच नसेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की मला "सारथी'तून बाजुला करा, असे राज्याचे बहुजन कल्याणमंत्री आणि "सारथी' चे प्रमुख विजय वडेट्टीवार म्हणाले.

"सारथी'चे (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे) प्रमुख विजय वडेट्टीवार यांच्यावर मराठा क्रांती मोर्चातर्फे विविध आरोप करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता, सारथी बंद करण्याचा कुठलाही विषय नाही. सारथी बंद होणार नाही. या प्रकल्पाला स्वायत्तता देण्याची मागणी करण्यात आली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत त्याचा निर्णय व्हावा, असे आपण सांगितलेले आहे.

मी सारथीचा प्रमुख नाही, संचालक म्हणून मला नेमण्यात आले आहे. वित्त मंत्रालयाने प्रकल्पासाठी 50 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यामधून हा प्रकल्प शक्‍य आहे, ते करण्याचा प्रयत्न केला आणि करीत आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही कामे करायची राहून गेली, पण ती कामे आता करणार आहे. त्यामुळे असले बिनबुडाचे आरोप अजिबात ऐकून घेणार नाही, असे ते म्हणाले.

खालच्या दर्जाचे राजकारण
50 कोटी रुपयांमधून जी कामे होणे शक्‍य नसेल, त्यासाठी अधिक निधीच्या मागणीसाठी प्रस्ताव पाठवू. कोरोनाच्या संकटामुळे फेलोशीपसह काही गोष्टी मागे पडल्या आहेत. पण याचा अर्थ असा नाही की, मी मराठ्यांवर अन्याय करतो. कुठलीही बैठक न घेता, चर्चा न करता थेट माध्यमांसमोर येऊन असे बोलणे म्हणजे विरोधाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्यातच दोन-तीन गट आहेत आणि मराठा क्रांती मोर्चाकडून हे राजकारण केले जात आहे. काही शंका असेल तर चर्चा करा. मी काही शेवटचा माणूस नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील ते चर्चा करू शकतात. पण थेट राजीनामा मागणे म्हणजे खालच्या दर्जाचे राजकारण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

काम गतिमान ठेवतो
या प्रकल्पाला न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे. नियमित बैठका घेतो आणि काम गतिमान ठेवतो. पण मराठा क्रांती मोर्चाने जे आरोप केले आहेत त्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा करणार नाही. त्यांचा माझ्यावर विश्‍वासच नसेल तर मी यातून बाजुला व्हायला तयार आहे आणि मुख्यमंत्र्यांनादेखील मी हेच सांगणार आहे. मग त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com