नागपूर : वाट्टेल ते कष्ट उपसायचे, पण पाचविला पुजलेली गरिबी दूर सारायचीच, या विश्वासाने छोट्याशा गावातील विष्णू संत्रानगरीत दाखल झाला. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न तो कमावू लागला. उन्हाळ्यात तर तो लाखभर रुपये जमा करायचा. मात्र, कोरोनाने दिवस पुन्हा पालटवले. आता भाजीचा ठेला ओढण्याची वेळ त्याच्यावर परतली आहे. याही स्थितीत "भोग सरल सुख येईल' या विश्वासाने तो दिवसभर राबतो आहे.
विष्णू पटेल हा मूळचा मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्याच्या एका गावातील रहिवासी. नशिबाने दिले त्यावर समाधान न मानता, मोठे स्वप्न उराशी बाळगून तो नागपूर नगरीत दाखल झाला. छोट्या ठेल्यावर दाबेलीचे दुकान थाटले. ग्राहकांचा सन्मान आणि समाधानावर भर दिला. लवकरच देवनगर परिसरात त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. काचीपुऱ्यातील छोट्याशा घरात त्याचा संसारही फुलत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुलांना सुटी लागताच विष्णू रसवंतीही सुरू करायचा. संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात लागायचे. सांघिक परिश्रमाच्या बळावर या कुटुंबाचे अडीच ते तीन महिन्यांचे उत्पन्न 1 लाखाच्याही वर जायचे. यंदा मात्र कोरोनाने घात केला. सर्वाधिक उत्पन्नाचा हंगामच बुडाला.
विपरित परिस्थिही विष्णूला थोपवू शकली नाही. त्याने ठेल्यावर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. फार उत्पन्न नसले तरी गाठीला असणारे पैसे खर्च करावे लागू नये, कुटुंबाचे भरणपोषण या व्यवसायातून व्हावे, येवढीच त्याची माफक अपेक्षा आहे. त्याच्यातील हा कणखरपणा लॉकडाऊनच्या काळात हिंमत गमाविणाऱ्यांसाठी दिशादर्शक आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.