आता भोंग्याचा आवाजही कानी पडत नाही आणि रस्त्यावरचा माणसाचा लोंढाही दिसत नाही...

file
file

हिंगणा एमआयडीसी( जि.नागपूर) : आजघडीला हिंगणा एमआयडीसी ओस पडलेली आहे. कधीकाळी कारखान्याच्या भोंग्याने परिसरात घडाळाची भूमीका पार पाडली, आता तो भोंग्याचा आवाजही ऐकणे दुरापस्त झाले आहे. कधी काळी कामगारांनी रस्ते फुललेले असायचे. आता शुकशुकाट पहायला मिळतो. परराज्यातून आलेले कामगार स्थानिकांसोबत मिसळून गेल्याने मिनी भारताचे रुप एमआयडीसीत पाहून धन्यता वाटायची. आता मात्र एकेकाने सगळे नजरेआड होत असल्याचे चित्र दिसत आहे. असे काय झाले येथे की, पाहता पाहता सगळी दुनियाच बदलून गेली.

 कारखाने मोजताहेत अखेरच्या घटका
 एमआयडीसी परिसरात उद्योगवाढीला महत्वाचे पाणी, वीज व जमीन मुबलक उपलब्ध आहे. उद्योगवाढीच्या दृष्टीने आणि उद्योगवाढीला वेग देण्यासाठी ‘बुस्टर डोस’ देण्याची आवश्‍यकता आहे. पण उद्योग येण्यासाठी आवश्यक ते मार्केटिंग न झाल्याने आणि सरकारने फारसे लक्ष न दिल्याने नवीन उद्योग येऊ शकले नाहीत, आणि जे कारखाने सुरू होते तेही अनेक आजघडीला बंद पडले असल्याचे मत चर्चेदरम्यान स्थानिक राजकीय नेत्यांनी स्पष्ट केले. नागपूर शहराला लागूनच असलेली एमआयडीसी ही सर्वात जुनी मोठी वसाहत आहे. त्यात पूर्वी सर्वप्रकारचे उद्योग होते. त्यात प्लास्टिक, लोखंड, औषधी, इंजिनिअरिंग अशा सर्वच उद्योगाचा त्यात समावेश होता. १९६० ला उभी झालेली एमआयडीसी १९९० पर्यंत जोरात सुरू होती. शहरातील विविध ठिकाणचे कामगार कामासाठी येत होते, आणि आजचे वाढलेले शहर हे याच एमआयडीसीच्या भरवशावर आहे. पण कालांतराने मेल्टान लिमिटेड, महाराष्ट्र ॲन्टीबॉयोटीक लिमीटेड, ब्लोप्लास्ट, व्हीआयपी इंडस्ट्रीज लिमिटेड, असे अनेक कारखाने बंद पडलेत. या कारखान्याला कच्चा माल तयार करुन देणारे शेकडो उद्योग बंद पडल्याने लाखो कामगारांच्या हातचा रोजगार हिरावून घेतला. पण यावर कुठल्याही सरकारने कारखान्यासाठी योग्य धोरण आखले नाही. त्यामुळे आजही एकामागून एक कारखाने झपाट्याने बंद होत आहेत .

पुढाऱ्यांनी हे करावे-
कामगारांच्या आंदोलनाला दोष देवून कारखाने बंद पडल्याचे बोलले जाते, पण हिंगणा एमआयडीसी हा प्रकार फार नाही. एकही कारखाना आंदोलनाने बंद पडला नाही. उलट कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. लोकाचा रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी हाच एकमेव उत्तम पर्याय आहे. आता एमआयडीसी ‘महामेट्रो’ आली आहे. आता गरज आहे एखाद्या मोठ्या उद्योगाची. हिंगणा तालुक्यात आमदार समीर मेघे व विरोधी पक्षात काम करणारे पुढारी आहेत, त्यांना हा विषय गांभीर्याने घेतला तर प्रश्‍न सुटू शकतो.

काम मिळविण्यासाठी मजूर वणवण
एकेकाळी लाखो कामगारांना रोजगार देणारी एमआयडीसी आज केवळ दहा ते १५ हजार मजुरांना काम देण्याइतपत असमर्थ झाली आहे. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी परराज्यातून आलेले कामगार घरदार सोडून परतीच्या वाटेवर आहेत. आता राज्यात नवीन सरकार आहे. ते मजूर, शेतकरी, कामगारांचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे जनतेला वाटते.

पुन्हा सुगीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करू
नोटबंदी, जीएसटी, जनतेवर लादून औद्योगिक क्षेत्राला डबघाईस आणण्याचे काम या केंद्र सरकारने केले. जीएसटीसारखा कर लादल्याने मोठी मंदी आली.  राज्यशासनाचे संपूर्ण अधिकार हिरावून घेतले. राज्याला वाटा मिळत नाही. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला मदत होत नाही. आजही कोविड १९ मध्येही चुकीच्या पद्धतीने लॉकडाउन केल्याने उद्योग बरबाद झाले. याची झळ कामगारांना उपाशी राहून सोसावी लागली. अशात  आम्ही राज्य सरकारकडे मागणी रेटून धरू. हिंगणा एमआयडीसीला पुन्हा सुगीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करू.
बाबा आस्टणकर
माजी सत्तापक्ष नेते
जि.प.नागपूर

जमिनी राज्य शासनाने ताब्यात घ्याव्यात
उद्योग मंत्रालयाने बंद उद्योगाची दखल घेऊन एमआयडीसी मालक असोशिएशन आणि इतरही या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे, त्यांच्याशी संवाद साधावा. मोठे उद्योग बंद झाले किंवा इतरत्र हलविले, अशा जमिनी राज्य शासनाने ताब्यात घ्याव्यात. कारण काही उद्योग एमआयडीसी बंद करुन घाटा दाखवून जमीन मालमत्ता बॅंकेत जमा आहे .आज या क्षेत्रात मोठा उद्योग अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्याशिवाय लहान उद्योग चालणार नाही आणि मजुरांना कामे मिळणार नाही.
विनोद ठाकरे
ग्रा.पं.सदस्य, डिगडोह
युवा नेते
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com