मुंढे साहेब, विलगीकरणात उपचारासाठी आणले की उपाशी मारायला?

why kept us in isolation?
why kept us in isolation?

नागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांना विलगीकरण केंद्रात पाठवले जात असून त्यांचे जेवण व इतर सुविधांबाबत प्रशासनाने हात वर केल्याचे चित्र आहे. वेळेवर जेवण, नास्ता मिळत नसून काहींना तर मंगळवारी रात्री जेवणही मिळाले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी उपचारासाठी आणले की उपाशी मारायला? असा प्रश्‍न उपस्थित केला. विलगीकरण केंद्रांची जबाबदारी असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर नागरिकांचा रोष व्यक्त होत आहे. 

गड्डीगोदाम येथे कोरोनाबाधित रुग्ण आढल्यानंतर या परिसरातील अनेक नागरिकांना व्हीएनआयटी येथे विलगीकरण केंद्रात आणण्यात आले. महापालिकेचे अधिकारी नागरिकांना विलगीकरण केंद्रात पोहोचवीत आहेत. गड्डीगोदाम येथील तीनशेवर नागरिकांना येथे विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात वृद्धांसह चिमुकल्यांचाही समावेश आहे. मात्र, येथे प्राथमिक सोयीसुविधाच नसल्याचे मंगळवारी संतप्त नागरिकांच्या व्हायरल व्हिडिओमुळे पुढे आले.

येथे आलेल्या नागरिकांनीच येथील असुविधांचे पितळ उघडे पाडले. येथे केवळ दोनच प्रसाधनगृहे असून अनेकांना नैसर्गिक प्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी काहींची तब्येत बिघडल्याचे येथील काही नागरिकांनी आप्तांना फोनवरून सांगितले. व्हायरल झालेल्या व्हिडिओतून एका महिलेने कुठल्याच सुविधा नसल्याचे स्पष्ट केले. अनेकांना नाश्‍ताही मिळाला नाही. मंगळवारी रात्री तीनशे नागरिकांपैकी केवळ निम्म्या नागरिकांना जेवण मिळाले तर निम्म्यांना उपाशी पोटीच झोपावे लागले.

यात काही चिमुकल्यांचा तसेच वृद्धांचाही समावेश आहे. सकाळी चहा आल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली. अनेकांना चहा मिळाले नाही. महिला व पुरुष एकच प्रसाधनगृह वापरत आहे. परिणामी येथे नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांना आणण्यात आले की चांगले आरोग्य बिघडविण्यासाठी? असा प्रश्‍न येथील नागरिकांनी उपस्थित केला. असा प्रश्‍न काही दिवसांपूर्वी आमदार निवास येथील नागरिकांनी उपस्थित केला होता. एकूणच विलगीकरण केंद्र आरोग्यासाठी नुकसानकारक ठरले आहेत. 

पिण्यासाठी दूषित पाणी 
एवढेच नव्हे पाण्यात किडे असल्याचेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पिण्याचे पाणी दूषित आहे. त्यामुळे लहान मुले व वृद्धांना काविळ होण्याची शक्‍यता काहींनी व्यक्त केली. पाण्याबाबत एका कर्मचाऱ्याकडे तक्रार केली असता ते दूषित असल्याचे त्यानेही मान्य केले. त्यामुळे जलजन्य आजाराची भीती व्यक्त होत आहे. 

नागरिकच करतात स्वच्छता 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात औषध फवारणी करून स्वच्छतेवर भर दिला जात आहे. त्याचवेळी व्हीएनआयटी येथील विलगीकरण केंद्रात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. येथे विलगीकरणात असलेल्या महिलाच स्वच्छता करीत आहे. स्वच्छतेसाठी कुणीही येत नसल्याचे येथील महिलांनी सांगितले. 

जबाबदार अधिकारी, डॉक्‍टर गायब 
विलगीकरणातील गैरसोयीबाबत कुणाकडे तक्रार करावी, येथे कुणीही अधिकारी नाही, अशी खंत काही नागरिकांनी व्यक्त केली. याशिवाय येथील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी कुणीही डॉक्‍टर फिरकले नाही, असेही काही नागरिकांनी सांगितले. तपासणीसाठी डॉक्‍टर येणार असल्याचे अधिकारी खोटे बोलल्याचा आरोपही काहींनी केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com