नागपूर : ‘फ्री फायर’ मोबाईल गेमच्या नादात तीन मुलांनी रेल्वेने मुंबईत पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलांना मुंबईत पोहोचण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले. तिन्ही मुलांना आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ‘फ्री फायर’ गेमच्या मोठ्या स्पर्धेचे आमिष मुलांना दाखविण्यात आले होते. यातून मानव तस्करीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतापनगरात राहणारे १५ ते १६ वर्षे वयोगटातील तीन मुले एकमेकांचे मित्र आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये ‘फ्री फायर’ नावाचा गेम डाऊनलोड केला होता. त्यांना मुंबईतील एका टोळीने हेरून ‘फ्री फायर’ गेमच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे या स्पर्धेत सहभाग घेण्याचे त्यांनी ठरविले होते. ते रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले.
दुसरीकडे प्रतापनरात तीन मुले बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली. पालकांनी प्रतापनगर पोलिस ठाणे गाठले. डीसीपी नरूल हसन यांच्या मार्गदर्शनात पीआय ठोसरे आणि पीएसआय विशाल नांदगाये यांनी मुलांचे मोबाईल लोकेशन घेतले. नाशिक रेल्वे पोलिसांनी मुलांनी ताब्यात घेत रविवारी नागपूर पोलिसांचे पथक पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वाधीन केले. सोमवारी सायंकाळी मुलांना कायदेशीर प्रक्रिया करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
नागपुरातून तीन मुले तर पश्चिम बंगालमधील कोलकता शहरातून काही मुले मुंबईला पोहोचणार होते. नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तीन मुले मुंबईत पोहोचण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले. परंतु, कोलकताच्या मुलांबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. त्यामुळे ती मुले मानव तस्करीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.