नागपूर : राज्य शिक्षण मंडळाद्वारे घोषित करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात यावर्षी तब्बल 26.57 टक्क्यांची वाढ झाली. कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात निकाल लागल्याने शाळा, महाविद्यालयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. निकाल वाढल्याने यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेवर होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी दहावीच्या निकालात झालेल्या घसरणीमुळे 21 हजारांवर जागा रिक्त होत्या. यावर्षी रिक्त जागांमध्ये घट होण्याची शक्यता आहे.
अकरावी प्रवेशादरम्यान गेल्यावर्षी ५८ हजार ८४० जागांपैकी २१ हजार २८२ रिक्त राहिल्या होत्या. यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे याविरोधात अनेक कनिष्ठ महाविद्यालये न्यायालयात गेली आहेत. यंदा राज्याचा निकाल ९५ टक्क्यांवर गेला. विभागाचा निकाल ९३.८४ टक्के लागला. १ लाख ५१ हजार ४४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये नागपूर जिल्ह्यात ६३ हजार ७७४ उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी १ लाख ८ हजार ९७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे उत्तीर्ण होणारे विद्यार्थी ४८ हजार ४६७ ने वाढले आहेत.
जिल्ह्याचा विचार केल्यास यावर्षी ५८ हजार १२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थांची संख्या जवळपास १५ ते १७ हजाराने वाढली आहे. याचा फायदा अकरावीच्या प्रवेशादरम्यान कनिष्ठ महाविद्यालयांना होणार आहे. दुसरीकडे विज्ञान, वाणिज्य यासह पॉलिटेक्निक, आयटीआय या सारख्या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी यावर्षी गर्दी दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिक्त जागांमध्ये घट होऊन त्याचा फायदा कनिष्ठ महाविद्यालयांना होणार आहे.
दहावीच्या निकालात यंदा सीबीएसई विद्यार्थ्यांप्रमाणेच राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. यंदा राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून विभागाचा निकालही 93.84 टक्क्यावर म्हणजे 26.57 टक्के वाढल्याने याचा फायदा राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशावेळी दोन्ही मंडळाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी कस लागणार आहे. अकरावी प्रवेशात राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत दरवर्षी सीबीएसई दहावीचे विद्यार्थी सरस ठरतात असे चित्र असते. गेल्या वर्षी राज्य मंडळाचा निकाल 18 टक्क्यांनी पडला होता. सीबीएसई निकालातही अल्पशी घट झाली होती. यंदा राज्य मंडळाचा निकालात 26.57 टक्क्यांनी वाढला आहे. शिवाय दोन्ही बोर्डात प्रथम स्थान पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सारखी आहे.
राज्यात यावर्षी कला, क्रीडा प्रकारातील गुणांचा समावेश करून 242 विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळाले आहेत. याशिवाय 83 हजार 262 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहे. राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालामध्ये झालेली ऐतिहासिक वाढ आणि वाढत्या टक्केवारीमुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना यावेळी राज्यभरात अकरावी प्रवेशाची चुरस दिसणार आहे.
जिल्हानिहाय निकाल
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.