'जगणे कठीण झाले हो! पाच-पन्नास रुपयांत उदरनिर्वाह कसा करणार?'

second lockdown affect poor people in nagpur
second lockdown affect poor people in nagpur

नागपूर : वर्षभरापूर्वी धंदापाणी चांगला होता. कमाईही बऱ्यापैकी होती. मात्र, कोरोना आला आणि आयुष्याचे पार वाटोळे झाले. गाडी रुळावर येत असतानाच पुन्हा लॉकडाउन लागला. त्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे, अशा शब्दांत फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. 

कसाबसा होतो गुजारा - 
धंतोली परिसरात नारळ पाणी विकणारा २७ वर्षीय गोविंदा साहू म्हणाला, दुसऱ्यांना लॉकडाउन लागल्यापासून परिस्थिती खूपच खराब झाली आहे. दुपारी एकपर्यंत धंदा केल्यानंतर मोठ्या मुश्किलीने १००-१५० रुपयांची कमाई होते. त्यात कसाबसा गुजारा होतो. विक्री झाली नाही की नारळ खराब होऊन जातात. गोविंदा गेल्या वर्षीपर्यंत चहा- नाश्त्याचा धंदा करत होता. कोरोनामुळे तो बंद करून नारळपाणी विकू लागला. प्रशासनाने किमान पाच-सहा वाजेपर्यंत धंदा करू द्यावा, अशी मागणी त्याने यावेळी केली. 

बायको-पोरांना कसे पोसणार? 
पंक्चर बनविणारे जाटतरोडी येथील गणेश सोनावणे म्हणाले, लॉकडाउनमुळे धंदा खूपच मंद आहे. गाड्यांमध्ये हवा भरून पाच-पन्नास रुपयांची कमाई होते. कधीकधी एखादा पंक्चर येतो. एवढ्याशा पैशात बायको-पोरांना कसे पोसणार? एकीकडे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, दुसरीकडे कमाई कमी होत आहे. 

लॉकडाउनमुळे परिस्थिती बिकट - 
गेल्या २५ वर्षांपासून नागपूरच्या रस्त्यांवर सायकलरिक्षा चालविणारे लक्ष्मण कावळे यांची परिस्थिती आणखीनच बिकट आहे. टॅक्सी व ऑटोंमुळे आधीच रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आहे. उरलीसुरली कसर कोरोनाने काढली. लॉकडाउनमुळे लोक घराबाहेर पडत नसल्याने दिवसभर प्रतीक्षा करूनही गिऱ्हाईक मिळत नाही. कमाई काहीच नाही. त्यामुळे रिक्षाचा किराया द्यायचा की घर चालवायचे, असा प्रश्न पडतो. कोरोनामुळे मुलाचाही पावभाजीचा धंदा बसला. गेल्या बारा महिन्यांपासून ही स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. 

दिवसभर तरी धंदा करू द्या - 
'सकाळ' ने लॉकडाउनचे चटके सहन करीत असलेल्या काही दुकानदारांच्या प्रतिक्रिया जाणून असता, प्रत्येकानेच लॉकडाउनला विरोध केला. कोरोनावर लॉकडाउन हा अंतिम उपाय नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रशासनाने केवळ एक वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश काढला आहे. परंतु, पहाटेच्या सुमारास धंदाच होत नसल्याचे बहुतेकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने निदान संध्याकाळपर्यंत तरी दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी 'सकाळ'च्या माध्यमातून दुकानदारांनी विनंती केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com