प्रेक्षकांनी 25 वर्षांपूर्वी अनुभवला होता नीरस सामन्यात रोमांच

 प्रवीण हिंगणीकर
प्रवीण हिंगणीकर

नागपूर  : विदर्भाचे बरेचसे रणजी सामने कंटाळवाण्या स्थितीत अनिर्णीत सुटले. विदर्भ आणि यजमान रेल्वे संघांत 25 वर्षांपूर्वी दिल्लीच्या कर्नेलसिंग स्टेडियमवर खेळला गेलेला चारदिवसीय रणजी सामना मात्र वेगळा अनुभव देणारा होता. या लढतीत उभय संघांचा एकही डाव पूर्ण झाला नाही. पण, क्रिकेटप्रेमींनी सामन्याचा शेवटच्या क्षणापर्यंत रोमांच अनुभवला. सामन्यात विदर्भाने बलाढ्य रेल्वेला पहिल्या डावाच्या आघाडीवर नमवून आपली ताकद दाखवून दिली. 

जानेवारी 1995 मध्ये झालेल्या त्या लढतीत विदर्भ संघाचे नेतृत्व प्रवीण हिंगणीकर यांनी केले. रेल्वेच्या संघाची धुरा अभय शर्मा यांच्याकडे होती. विदर्भ संघात उमाकांत फाटे, सदाशिव अय्यर, परिमल हेडाऊ, योगेश घारे, प्रीतम गंधे, उल्हास गंधे, मनीष दोशी, सुधीर वानखेडे, ओवेस तालिबसारखे दिग्गज खेळाडू होते. रेल्वे संघातही कसोटीपटू संजय बांगर, राहुल संघवी, युसूफ अली खान, व्ही. यादव, ए. सरवटे, के. भरतन, आर. के. बोराह, एस. घोष, जे. आलम, आय. ठाकूरख्या घरगुती क्रिकेटमधील दर्जेदार फलंदाज व गोलंदाजांचा समावेश होता. खेळपट्‌टीचे स्वरूप बघता सामना निकाली निघणार नाही, हे सर्वांनाच माहिती होते. या परिस्थितीत पहिल्या डावातील आघाडी निर्णायक ठरणार होती. 

विदर्भाने नाणेफेकीचा कौल मिळवून रेल्वेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. परंतु, गोलंदाजांना उपाहारापर्यंत एकही यश मिळाले नाही. त्यामुळे निर्णय चुकला की काय असे वाटू लागले होते. ब्रेकनंतर कर्णधार हिंगणीकर यांनी अलींची महत्त्वपूर्ण विकेट घेऊन रेल्वेच्या घसरगुंडीला सुरुवात केली. रेल्वेचे नियमित अंतराने गडी बाद होऊन दिवसअखेर त्यांचा पहिला डाव 256 धावांवर संपुष्टात आला. हिंगणीकर व दोशी यांनी प्रत्येकी तीन आणि तालिब यांनी दोन गडी बाद करून रेल्वेला कमी धावांमध्ये रोखून धरले. यादव (75 धावा), अली (52 धावा) व मधल्या फळीतील भरतन (55 धावा) यांची अर्धशतके रेल्वेच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. याशिवाय बांगर यांनी 44 धावा फटकावल्या. 

आघाडीसाठी जोरदार चुरस 


गोलंदाजांनी रेल्वेला अडीचशेत गुंडाळून आपले काम चोखपणे बजावल्यानंतर विदर्भाची सर्व भिस्त आता फलंदाजांवर होती. सुदैवाने या परीक्षेत वैदर्भी फलंदाज शंभर टक्‍के गुणांसह उत्तीर्ण झाले. फाटे-अय्यर जोडीने शतकी (119 धावा) सलामी दिल्यानंतर उर्वरित फलंदाजांचे काम आणखीनच सोपे झाले. विदर्भाने 8 बाद 271 धावांपर्यंत मजल मारून पहिल्या डावातील 15 धावांच्या आघाडीसह सामनाही जिंकला. फाटे यांनी 84, अय्यर यांनी 57 व सामन्यात अष्टपैलू कामगिरी बजावणारे कर्णधार हिंगणीकर यांनी 61 धावा काढून विजयात निर्णायक योगदान दिले. रेल्वेकडून फिरकीपटू संघवी व ठाकूर यांनी प्रत्येकी चार गडी बाद करून विदर्भाला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com