वाढत्या वाघांच्या संख्येवरून मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाले ते...

Sterilization of Tigers is The Last Option
Sterilization of Tigers is The Last Option

नागपूर :  चंद्रपूर जिल्ह्यातील निवडक वाघ आणि वाघिणींची तात्पुरती नसबंदी करणे हा शेवटचा पर्याय आहे. त्यासाठी समिती नेमण्यात येईल. तज्ज्ञांसोबत चर्चा करून शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. ७) झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाची बैठक व्यक्त केले. 

राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते अध्यक्ष स्थानाहून बोलत होते. वनमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) रामबाबू, वन सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे नवनियुक्त सदस्य उपस्थित होते. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील निवडक वाघ आणि वाघिणीची तात्पुरती नसबंदी करणे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ५० वाघांच्या स्थलांतरणाचा मुद्दासह १६ विषयांवर चर्चा करण्यात आली. 

दीड वर्षानंतर झालेल्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतरणाचा विचार करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मानवाचे पुनर्वसन करण्यात येते तर मग वन्यप्राण्यांचे का करता येऊ नसे, त्या धर्तीवर वाघाच्या पुनर्वसनासाठीही अभ्यासगट स्थापन करण्याच्या सूचना वन विभागाला त्यांनी दिल्या. वाघांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव असल्याचे वृत्त सकाळने पाच ऑगस्ट रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर इतर मध्यमांमध्ये व वन्यजीव तज्ज्ञांमध्ये चर्चा होऊ लागली. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अतिशय सावध भूमिका घेत या विषयावर पडदा टाकला.

राज्यात ३१२ वाघ असून, त्यातील काही वाघ चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेपासून पाच किलोमीटर अंतरावर आहेत. चांगल्या संरक्षण व संवर्धनामुळे वाघांची संख्या वाढत आहे. पुढील वर्षातही ती वाढण्याची शक्यता असल्याने हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पक्षी सप्ताह ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मोगरकसा वन्यजीव राखीव, महेंद्री, कन्हारगाव आणि तिल्हारी अभयारण्याच्या प्रस्ताव सादर करा अशा सुचना दिल्या आहेत. लोणार अभयारण्यातील बेडी बाभूळ काढण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. 


राज्य कांदळवन वृक्ष ‘सफेद चिप्पी 


राज्य सरकारने राज्यवृक्ष आंबा, राज्य प्राणी शेकरू, राज्यपक्षी हरियाल, राज्य फुलपाखरू म्हणून ‘ब्ल्यू मॉरमॉन’ व राज्य फूल जारूल घोषित केले आहे. त्याच धर्तीवर आता राज्य कांदळवन वृक्ष म्हणून ‘सफेद चिप्पी‘ मान्यता देण्यात आली. 

प्रत्येक जिल्ह्यात उभारणार ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर 


राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांच्या संकल्पनेतून साकार झलेले व नागपूर येथील सेमिनरी हिल्य येथे कार्यान्वित असलेले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवी झेंडी दिली. वनमंत्री संजय राठोड यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मानवासाठी जसे रुग्णालय असते त्याच प्रकारे वन्यप्रण्यांसाठीही आरोग्य केंद्र उभारावे. 
 

शहरांमध्ये वन्यजीव प्रशिक्षण केंद्र 

नवयुवकांमध्ये वन्यजीवांबद्दल प्रेम निर्माण व्हावे, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय वन्यजीव संस्थेच्या मदतीने वन्यजीव प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर प्रत्येक शहरात असे केंद्र सुरू करावे. त्यासाठी मदत करण्यासाठी तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com