बंद कारखान्यांवर चोराचा पहारा, अंधारात होतेय मालक, बॅंकाना चुना लावण्याचे काम

file
file

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) : अनेक कारखान्यांचे भोंगे बंद पडले. परिसर निर्मनुष्य झाला. कामगार रिकामा झाला. त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. कारखान्यावर आधारित परिसरातील छोटे मोठे व्यापारी उद्वस्त होण्याच्या मार्गावर येऊन ठेपले. तरुणांच्या मनात काम मिळत नसल्याने भावनांचा उद्रेक होताना दिसतो. चोऱ्यांचे प्रमाण वाढले. बंद कारखान्यातील उरलेसुरले साहित्य चोरांनी लंपास केले. प्रसंगी खूनही व्हायला सुरूवात झाली. एवढे सगळे एका अविवेकामुळे झाले. कारखाने जीवंत राहिले तर सगळे जगतील, अन्यथा अशीच परिस्थिती सर्वांच्या वाट्याला येईल, हे  साधे सामाजिकतेचे सुत्र कुणी लक्षात घेतले नाही. आताही कारखाने बंद पडत असताना शेतीवर आधारित उद्योग सुरू करण्यात पुढाकार घ्यावा असे मत परिसरातील नागरिक व्यक्त करताना दिसतात.  
अधिक वाचाः आता भोंग्याचा आवाजही कानी पडत नाही आणि रस्त्यावरचा माणसाचा लोंढाही दिसत नाही...

 एमआयडीसीला वाचवायचे असेल तर हे करावे लागेल
शहरी भागात पोट भरण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चाललेला आहे. त्यातही एका मागून एक उद्योग बंद पडत असल्याने कामगार, मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे, पण दुसरीकडे महाराष्ट्रात १ लाख४२ हजार तर हिंगणा एमआयडीसीत ४००च्या जवळपास उद्योग बंद असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यावर उपाययोजना करणे शासन, प्रशासनाला गरजेचे झाले आहे. कारण बंद कारखान्यांवर चोराचा पहारा असल्याने मालक आणि बॅंकाना चुना लावण्याचे काम अंधारात होत आहे. त्याचबरोबर एमआयडीसीला वाचवायचे असेल तर शेतीला पूरक उद्योगाची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. विदर्भातील जुनी मोठी औद्योगिक वसाहत म्हणून नावाजलेली हिंगणा एमआयडीसी आहे. जमीन, वीज, पाणी जरी मुबलक असले तरी रस्ते, रेसिडेन्सीयल झोन, पर्यावरण आदी समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी विविध संघटनेचे पदाधिकारी प्रयत्न करुन दमलेत . पण अद्याप त्या सुटलेल्या नाहीत. त्या सोडवण्यासाठी शासनातर्फे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. मुख्यमंत्री बदलले,  पण प्रश्‍न मात्र कायमच राहिला आहे.

जमीन फक्त कागदावर
अनेक कारखानदारांनी एमआयडीसीकडून जमीनी कागदोपत्री घेऊन उद्योग, कारखाना थाटला. अडचणींचा सामना करीत काही वर्ष कारखाना चालवित नफाही कमविला. एमआयडीसी आणि राज्य सरकारचा फायदा घेतला. दुसऱ्या राज्यात पुन्हा जास्तीची सेवा मिळणार म्हणून दुसऱ्या राज्यात उद्योग सुरू केला. मोठ मोठी मशीनरी ‘सिफ्ट’ केली. एमआयडीसीतील कंपनीत तोटा दाखवून बंद केली. अशा कंपन्यावर बॅंकेचे कर्ज असल्याने कंपनीच्या बाहेर बॅंकेचे बोर्ड लावले. आज दरवाजे, लोंखडी खिडक्या, लहान मशनरी चोरट्यांनी लंपास केली.

महिंद्रा ॲंड महिंद्रा शेकडो जगवितो शेकडो उद्योगांना
महिंद्रा ॲंड महिंद्रा कंपनी एमआयडीसीत धीर धरुन आहे. ट्रॅक्टरचे सुटे अनेक भाग लहान कंपन्याकडून करवून घेते. त्यात अनेक प्रकारच्या भागांचा समावेश आहे. एकट्या कंपनीच्या जोरावर शेकडो कंपन्या जगत आहेत आणि हजारो कामगांराचा पोटापाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. १९६० नंरच या कंपनीची एमआयडीसीत ‘एंट्री’ झाली, तेव्हापासून ती आजही डौलाने उभी आहे. असेच मोठे उद्योग या परिसरात यावेत, अशी येथील कामगार संघटनेची मागणी आहे .
 

गारमेन्ट क्लस्टर आणावे !
एमआयडीसीत सर्वच उद्योग आले आहेत. काही हळूहळू बंद पडत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीला पुरक उद्योगाची निंतात गरज आहे. बंद कारखाने ताब्यात घेऊन या ठिकाणी असे उद्योग उभे व्हावे. तेव्हा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि कामगारांच्या हाताला काम. मी मेटल टाईज कंपनी सुरू असताना माझ्या उद्योगाच्या माध्यमातून कच्चा माल पुरवित होतो. पण नंतर कंपनी बंद झाली आणि माझा उद्योगही .बबनराव आव्हाळे
हिंगणा पचायत समिती
सभापती

बंद कपन्यामुळे चोरांचा धुमाकूळ वाढला.
साधारणपणे माझ्या ग्रामपंचायत श्रेत्रात येणाऱ्या १५ ते२० कंपन्या बंद आहेत. एमआयडीसी परिसरातील जनता ही एमआयडीसीतील उद्योगावर उदरनिर्वाह करते. ग्रामपंचायतीचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहे. पहिले कारखाने ग्रा.पं.ला कर देत होते, पण आता तेही देत नाही. ट्रॅक्टर कंपनीमुळे लोकांना थोडा आधार आहे. असाच एखादा मोठा उद्योग आमच्या परिसरात सरकारने आणावा. आम्ही ग्रामपंचायत सर्व मदत करण्यास तयार आहे.
कैलास गिरी
ग्रामपंचायत डिगडोह
उपसंरपच

...तरच दुकानदार जगेल.
सर्वांची उपजिवीका एमआयडीसीवर आहे. निवडणुकीत भाषणात एमआयडीसीतील बंद कारखाने सुरु करून बोलल्याशिवाय भाषणच सुरू होत नाही. पण नंतर ठोस उपययोजना होत नाही. हळूहळू कंपन्या बंद होत आहेत. कामगार, गरीबांच्या हाताला काम नसल्याने या परिसरातील सर्वच दुकानदार मंदीच्या सावटाखाली जगत आहे. सर्व प्रकारच्या दुकानदारांचा यात समावेश आहे. यासाठी ‘सकाळ’ प्रयत्न करित असेल तर ते स्वागतार्ह आहे.
बबन पडोळे
उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते

शासनाने उद्योगवाढीसाठी प्रयत्न करावेत
विदर्भातील अनेक लहान व्यापाऱ्यांना कपडे घेण्यासाठी गुजरात, लुधियाना, दिल्ली, सुरत अशा अनेक दुसऱ्या राज्यात जावे लागते. आणि खर्चही मोठा येतो. वस्तूंची किंमत वाढते. गारमेन्ट क्लस्टर झोन जर एमआयडीसीतील बंद कंपन्या ताब्यात घेवून त्या दिशेन पाऊल उचलल्यास शेकऱ्यांच्या कापसाचेही महत्व वाढेल. म्हणेच शेतकऱ्यांचा फायदा होईल, दुसरीकडे कामगारांच्या हाताला काम मिळेल. विदर्भात व्यापार वाढेल. शासनाने उद्योग वाढीसाठी अभ्यास समिती नेमावी .अशा स्वरूपाचे मालक आहेत त्यांना कारखाने खोलण्यासाठी प्रयत्न करावा.  
जीवन जंवजाळ
पोलिस नगर एमआयडीसी
नागपूर

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com