नागपूर : कोरोनाची स्थिती अनेकांना भयावह वाटत आहे. मात्र यासाठी मन:स्थितीही जबाबदार आहे. प्रत्येकजण भीती बाळगतो आणि भीतीमुळे विश्वास कमी कमी होतो. भीतीमुळे मन अशांत होते. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीचा स्वीकार करा, त्यामुळे भीती कमी होईल. रोगप्रतिकारशक्ती बळकटीसाठी सकारात्मक विचार करा, असा सल्ला आध्यात्मिक मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रबोध यांनी नागरिकांना दिला.
महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोविड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मंगळवारी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळात मानसिक संतुलन टिकवून ठेवणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. मन शुद्धीसाठी प्राणायाम करा. स्वत:शी सकारात्मक बोलणे हे सुद्धा प्राणायामच आहे.
मागील किमान ६ महिन्यांपासून लोक घरात कोंडली गेली. नकारात्मकतेने मनात भीती निर्माण केली आहे. यातून बाहेर निघण्यासाठी औषधाची नव्हे तर स्वत:शी नेहमी सकारात्मक बोलत राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आजच्या अनिश्चिततेच्या वाटेत प्रेम हाच उपाय असून इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा ते तुमच्या वागण्या, बोलण्यातून इतरांना द्या, असेही आवाहन डॉ. प्रबोध यांनी केले.
विचाराचा परिणाम शरीरावर
विचारात मोठी शक्ती असून त्याचा परिणाम शरीरावर होतो. कोरोना पॉझिटिव्ह येणे म्हणजे विषाणूने शरीरात प्रवेश करणे एवढाच त्याचा अर्थ आहे. आपण मनाच्या माध्यमातून शरीराला भीतीचा पुरवठा करीत असतो. त्यामुळे मनाला सशक्त, सजग करण्यासह प्रतिकारशक्ती अधिक बळकट करण्याची गरज आहे. त्यासाठी सकाळी उठल्यापासून सकारात्मकता ठेवा, असा सल्ला डॉ. प्रबोध यांनी दिला.
आलिंगन टाळून शब्दातून करा प्रेम व्यक्त
कोरोनामुळे हस्तांदोलन, आलिंगन टाळून शब्दांमधून प्रेम व्यक्त करा. तोंड आणि नाकावर मास्क घाला, भावनांवर घालू नका. एकमेकांना आधार द्या. कोरोनाबाधित रुग्ण हा अपराधी नाही, तो पिडीत आहे. त्याच्याकडे पिडीत म्हणून पाहा, तुमच्या मनातून सांत्वना निघतील. स्वत:वर विश्वास ठेवा, असे डॉ. प्रबोध म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.