नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात आलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये गेल्यावर्षी 21 हजार 282 जागा रिक्त होत्या. मात्र, यानंतरही काही कनिष्ठ महाविद्यालयांकडून वाढीव तुकड्या देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरवर्षी काही मोजक्या महाविद्यालयांचा वाढीव तुकड्यांसाठी प्रस्ताव येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अकरावीमध्ये विज्ञान आणि द्विलक्षी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रानिक्स आणि फिशरीजकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. विशेष म्हणजे नामवंत महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड असते. त्यामुळे येथील प्रवेश दोन दिवसातच फुल्ल होतात. त्यामुळे यापैकी काही महाविद्यालयांकडून वाढीव तुकड्यांचे प्रस्ताव दरवर्षी टाकण्यात येतात. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयात वाढीव तुकडी देताना, त्यासदर्भात सोयी-सुविधा आहे काय? याबाबत तपासणी करणे आवश्यक असते.
मात्र, अशा प्रकारची तपासणी विभागाकडून होताना दिसून येत नाही. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागामार्फत द्विलक्षी अभ्यासक्रमांच्या वाढीव तुकड्यांची मान्यता मिळत असते. त्यामुळे यासाठी आवश्यक असलेली प्रयोगशाळा आणि वर्गखोल्यांची सुविधा तपासणे अपेक्षित असते. मात्र, विभागाकडून ती तपासण्याची तसदी घेतल्या जात नाही. त्यामुळेच शाळांकडून सातत्याने वाढीव तुकड्यांची मागणी करण्यात येत आहे. यावर्षीही जवळपास पाच ते सहा प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. दरम्यान याबाबत सहसंचालक देवतळे यांना संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आर्थिक गणित जोरात
दरवर्षी मोजक्यात कनिष्ठ महाविद्यालयांकडून वाढीव तुकड्यांसाठी अर्ज केल्या जातात. या तुकड्या प्रदान करताना विभागातील अधिकाऱ्यांच्या संगणमतानेच कामकाज केल्या जाते. त्यातूनच कनिष्ठ महाविद्यालयात सुविधा नसताना, वाढीव तुकड्या दिल्या जात असल्याचे दिसते. या तुकड्या देत असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होताना दिसून येते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.