काट्यागोट्यातून चालताना पायाचेही लोखंड झाले! पण कधी फुले बरसली नाहीत

पांदण रस्त्यांची झालेली दुर्दशा
पांदण रस्त्यांची झालेली दुर्दशा

जलालखेडा (जि.नागपूर) : मित्रहो, गेल्या अनेक दिवसांपासून मनात खदखदत असलेली व्यथा आता तुमच्यासमोर मांडण्याचा योग आला. पालकमंत्री पांदण रस्ते योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बारमाही चांगले पांदण रस्ते निर्माण करण्याचा युती शासनाचा प्रयत्न होता. त्यानंतर मात्र काय झाले कुणास ठाऊक ! या योजनेकडे ढुंकूनही कुणी पाहिले नाही हो ! जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासारखी माझीही दशा झाली दादा! शेवटी डबक्यासारखा पांदण रस्त्याचा ‘बॅकलॉग’ निर्माण झाला तो झालाच. काट्यागोट्यातून चालताना त्या शेतकऱ्यांच्या पायाचेही लोखंड झाले, पण त्यांच्या वाटेवर फुलं कधीच पडले नाही ! मित्रहो, माझी व्यथा तुमच्यासोबत ‘शेअर’ करण्यासाठी मी तुमच्याशी थोडं मनातलं बोलत आहे, बरं का !  

गावानजीकचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले
 नरखेड तालुक्याच्या प्रत्येक गावात शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते असून माझी महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र देखभालीअभावी तालुक्यातील बऱ्याच पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे बरं का. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी चिखलमय पांदण तुडवत शेतात जावे लागते. पावसाळा संपत आला, मात्र अद्यापही तालुक्यातील माझी वाट मात्र चिखलमयच आहे. तालुक्यातील अनेक पांदण रस्ते हे बारमाही शेतात जाण्यायोग्य नसल्याने शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याचा सर्वात जास्त परिणाम त्याच्या पिकयोजनेवर पडत असल्यामुळे त्याला पावसालात येणारी पिके घेता येत नाही. त्याला पारंपारिक शेतीशिवाय पर्याय नाही. शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल, याकरिता आमचा उपयोग होतो. तालुक्यातील काही पांदण रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून मातीकाम झाले आहे. तर काही गावानजीकचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले. हे रस्ते पायवाट म्हणून अजूनही वापरले जात आहेत. शेतकऱ्यांना जोपर्यंत शेतात जाण्या-येण्यासाठी चांगले रस्ते मिळत नाही, तोपर्यंत त्याचे उत्पादन वाढणार नाही, अशी वल्गना प्रत्येक पक्ष करीत असतो, पण याकडे पाहिजे तसे लक्ष न गेल्यामुळे शेतकरी चिखलातूनच आपले मार्गक्रमण करून पिक काढत आहे.

अधिक वाचाः गावातील तंटामुक्त समितीचे पदाधिकारी झाले व्यसनाधीन

निधीच उपलब्ध झाला नाही !
नरखेड तालुक्यातील शेत पांधण रस्त्यांची अर्थात अवस्था खूपच वाईट आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी हे संत्रा व मोसंबी बागायतदार आहेत. रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याने तेथून संत्रा व मोसंबी तसेच पावसाळी पिके व भाजीपाला या पिकांची वाहतूक करता येत नाही. म्हणून या भागातील शेतकरी त्रस्त आहेत. मागील युती शासनाच्या काळात पांदण रस्त्याचा मोठा गाजावाजा करीत पालकमंत्री पांदण रस्ता योजना सुरु करण्यात आली होती. तरी पण आजही पांदण रस्त्याचे ‘बॅकलॉग’ भरपूर आहे. त्यातच यावर्षी कोणतेही पांदण रस्ता निधी उपलब्ध झाला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. तरी ग्रामीण भागाला जोडणाऱ्या पांदण रस्ता निधी उपलब्ध होणे, गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

अधिक वाचाः  कुटुंबीय निघाले होते लग्नाच्या गाठी जोडायला, पण बालसंरक्षण अधिकाऱ्यांना लागली कुणकुण

शासनाने चांगले रस्ते उपलब्ध द्यावेत!
पालकमंत्री पांदण रस्ते योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बारमाही चांगले पांदण रस्ते निर्माण करण्याचा युती शासनाचा प्रयत्न होता. पण शासन गेले व नवीन शासनाने यावर निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे बळीराज्याच्या शेतात जाणारी वाट अवघड झाली आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले रस्ते शासनाने उपलब्ध करून दिले तर शेतकऱ्यांच्या परिस्थिती मोठा बदल येऊ शकतो.
 उकेश चव्हाण, माजी जि. प. सभापती, नागपूर

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com