कुणाला नकोय अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ? वाचा सविस्तर

Who doesn't want the 21st online admission process? Read detailed
Who doesn't want the 21st online admission process? Read detailed

नागपूर  : अकरावीच्या प्रवेशादरम्यान होणारा खर्च आणि विलंबाने कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेशावर परिणाम होत असल्याने नागपुरासह राज्यात केंद्रीय प्रवेश समितीमार्फत घेण्यात येणारे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नकोच अशी भूमिका शहरातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी घेतली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या बाबतचे निवेदन पाठविले आहे.

मुख्याध्यापक संघाच्या वतीने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत चर्चेसाठी ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेशासाठी शहरनिहाय केंद्रीय प्रवेश समिती तयार करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात येते. मात्र, ही प्रक्रिया पार पाडताना, जवळपास 4 महिन्याचा कालावधी लागतो. यामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर मोठा परिणाम होतो. तसेच महाविद्यालयातील कर्मचारी या प्रक्रियेत व्यस्त राहतात. याऊलट ग्रामीण भागात 20 दिवसात प्रक्रिया पूर्ण होऊन वर्ग सुरू होतात. त्यामुळे शहरातील बहुतांश प्रवेश ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये जातात. परिणामी शहरातील महाविद्यालयांच्या अकरावीच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहतात.

गेल्यावर्षी एकट्या नागपुरात 21 हजारावर जागा रिक्त राहील्या होत्या. औरंगाबाद येथे त्याची संख्या 8 तर पुणे आणि मुंबईमध्येही जवळपास हजारो जागा रिक्त राहील्याचे चित्र दिसून आले होते. तसेच, अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये लावण्यात आलेल्या आरक्षणात मोठ्या प्रमाणात दोष असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे विद्यार्थी ग्रामीण भागात प्रवेश घेतल्यावर शिकवणी वर्गाकडे वळतात. त्यामुळे महाविद्यालयात न शिकता शिकवणी वर्गातच जाताना दिसून येतात. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी केंद्रीय प्रवेशमार्फत होणारी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करुन जुन्याच पद्धतीने अकरावीमध्ये प्रवेश देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाह रविंद्र फडणवीस यांनी केली.

प्रक्रियेबाबत देण्यात येणारे हमीपत्र मुख्याध्यापक देणार नसल्याची भूमिका संस्थाचालकांची असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष किशोर मासूरकर, विजुक्‍टाचे अशोक गव्हाणकर, विलअस केरडे, वंदना बडवाईक यांनी आपले मत व्यक्त करीत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नको अशी भूमिका घेतली. बैठकीत 89 मुख्याध्यापक उपस्थित होते.


प्रक्रियेतून मोठी आर्थिक लुट
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये समितीमार्फत अकरावी प्रवेशासाठी 20 रुपयाऐवजी 150 ते 250 रुपये एका विद्यार्थ्याकडून घेतले जाते. यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट होत आहे. विशेष म्हणजे प्रक्रियेला ऐवढा पैसा लागत नसताना तो घेतल्यामुळे प्रक्रियेतील लाखो रुपये उपसंचालकांकडे उपलब्ध आहेत. शिवाय आवश्‍यकता नसताना काही विशिष्ट महाविद्यालयाला दरवर्षी नवीन तुकडी देण्यात येते. मात्र, त्यातील शिक्षकांना कुठलेही वेतन देण्यात येत नसल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com