शेतकरी-अडत्यांच्या नात्यांत का रे असा दुरावा?

file
file

वेलतूर (जि.नागपूर) :   एकेकाळी अडत्यांचे व शेतकऱ्यांचे संबंध डॉक्‍टर व रुग्ण यासारखेच होते. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीसाठी बाजारपेठेतील अडत्या सतत मदत करीत असे. त्यांच्यात व शेतकऱ्यांत जिव्हाळा होता. अनेक वेळा शेतकरी अडत्याच्या दुकानावरच मुक्काम करीत. त्यांच्या भोजनाची काळजीही "आडते' घेत असे. काळानुरूप सर्वच नाती या ना त्या कारणाने अस्तंगत होत चालली. परिणामी, डॉक्‍टर व रुग्ण यांच्या नात्यात ज्या गतीने दुरावा उत्पन्न झाला, त्याच गतीने तो "अडत्या' व शेतकरी यांच्या नात्यातही होत आहे.

नियमांकडे दुर्लक्ष
शेतकरी हा केंद्रबिंदू मानून बाजार समितीची रचना करण्यात आली. राज्यभर तीनशेच्या आसपास बाजारपेठा आहेत. काही ठिकाणी उपबाजारपेठाही कार्यरत आहेत. बाजार समित्यांमुळे शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी नेण्याची सुविधा उपलब्ध झाली. बहुतांश वेळा त्याच्या मालाची विक्री झाल्यानंतर त्याचे पैसे मिळण्यात फारशा अडचणी आल्या नाहीत. त्यामुळे बाजार समितीचा लाभ प्रामुख्याने शेतकऱ्यांना झाला. मात्र, नियमांकडे फारसे कोणी कटाक्षाने पाहत नाही, हे एकदा यंत्रणेला लक्षात आल्यानंतर त्यात दोष उत्पन्न होण्यास सुरुवात झाली आणि शेतकरीहिताच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या अडत्या व व्यापाऱ्यांच्या गुलाम झाल्या. त्या नियम बदलानंतरही राजकीय वरदहस्तामुळे कायम आहेत. यात शेतकरी नागवला जात आहे. ऑनलाइन चुकाराच्या नावावर धनादेश दिले जातात. मात्र, त्यातील वटण्यावरीच्या तारखा संशोधनाचा विषय आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रात नव्या कायद्याची गाजतवाजत अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, अजूनही त्याच पद्धतीने बाजार समितीची वाटचाल सुरू आहे. अजूनही काही अपवाद असले तरी पूर्वीसारखे नाते राहिले नाही, हे सर्वच जण मान्य करतात. हेच नाते परत प्रस्थापित व्हावे, अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

शेतक-यांची अवहेलना थांबवावी
जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरीवर्गाचा मान आहे. पण, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारपेठेत त्याची अवहेलना केली जाते. ही थांबावी.
-राजानंद कावळे
सामाजिक कार्यकर्ते

हितसंबंध जपले जावेत
शेतकरी, दलाल, मापारी, हमाल याच्यातील जिव्हाळा कायम राहावा. या जिव्हाळ्यातून एकमेकांचे हितसंबंध जपले जावेत.
-अर्चना शहारे, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन कार्यकर्त्या
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com