Agitation : कत्तलखान्याविरोधात वारकरी उतरले रस्त्यावर; तीन हजार स्थानिकांनी केले रास्तारोको आंदोलन

सुरगाव येथील प्रस्तावित कत्तलखान्याच्या विरोधात शेकडो वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन.
agitation for Slaughterhouse
agitation for Slaughterhousesakal
Updated on

उमरेड - सुरगाव येथील प्रस्तावित कत्तलखान्याच्या विरोधात शेकडो वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यामुळे उमरेड- नागपूर महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोमवारी सकाळी दहा वाजतापासून आंदोलनाला सुरुवात झाली.

उमरेड तालुक्यातील सुरगाव येथील कत्तलखाना सुरू करण्याचे नियोजन आहे त्या निषेधार्थ सोमवारी उमरेड -नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वारकरी हातात भगवी पताका, टाळ-मृदंग, वीणा घेऊन रस्त्यावर उतरलेत. सकाळी १० ते दुपारी साधारणतः ४ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या रस्ता रोको आंदोलनामुळे महामार्गांवर दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती.

शासनाच्या या धोरणाचा यावेळी निषेध करण्यात आला. आम्ही वारकरी जरी असलो, पण जेव्हा आमच्या धर्माची हानी होईल अशा प्रकारच्या गोष्टी या महाराष्ट्रात घडणार असतील, तर आम्ही सगळे वारकरी धारकारी सुद्धा होऊ शकतो, असा इशारा यावेळी वारकऱ्यांनी दिला.

सुरगाव येथील खसरा क्रमांक ३६८ मधील ३.१३ आर हे भूमी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने प्रस्तावित कत्तलखान्यासाठी दिली जात आहे. त्याच्या स्थगितीसाठी ग्रामस्थ, बहुसंख्य वारकरी, गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक, विविध हिंदू संघटना, गो-सेवा संघटनांकडून उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

मात्र त्याचा काही उपयोग होत नसल्याने आज तीन हजार ग्रामस्थ रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन करीत होते. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात ४०- ५० एसटी बसेस सुद्धा अडकून पडल्या होत्या. खासगी वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसेस, कोळसा वाहतूक करणारे टिप्पर यासारखे असंख्य वाहने वाहतूक कोंडीमुळे अडकले होते.

येत्या १७ तारखेपर्यंत जर हा निर्णय मागे घेतला नाही तर आषाढी वारीच्या विठुरायाच्या महापुजेत मुख्यमंत्री शिंदे व गृहमंत्री फडणवीस यांना मंदिरात प्रवेश करू देणार नाही, असा इशारा वारकऱ्यांनी दिला. आंदोलन स्थळी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी विज्ञासागर चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार व अधिकारी दाखल झालेत.

पोलिस अधीक्षकांनी उपविभागीय अधिकारी विज्ञासागर चव्हाण यांच्या मार्फत आंदोलकांना लेखी पत्र देत कत्तलखाना प्रस्ताव रद्द करण्यासाठी सरकारला विनंती करू, असे आश्वासन दिले. तसेच आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत आंदोलन मागे घेतले.

जय हरी विठ्ठलच्‍या घोषणा

सुरगाव येथील कत्तलखान्याविरोधात गेल्या महिनाभरापासून धुसफूस सुरू आहे. अनेक नेत्यांनी हा कत्तलखाना होऊ नये म्हणून आमदार, मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, सरकारने यावर कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे नागरिकांचा आणि वारकऱ्यांचा सरकारवर रोष वाढत गेला. आज, सोमवारी सकाळपासून उमरेड- नागपूर महामार्गावर वारकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. वारकरी आपल्या पारंपारिक वेशात आले.

हातात वीणा आणि मृदंग घेऊन जय हरी विठ्ठलाच्या घोषणा देऊ लागले. दुपारनंतर स्थानिक नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले. रस्त्यावर आंदोलन सुरू झाल्यामुळे पाच तासात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागपूर महामार्गच बंद झाला होता. दुसरीकडे पोलिसांची ताफाही मोठा होता. जोपर्यंत सरकार कत्तलखाना दुसरीकडे हलवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.