एमबीए प्रवेश प्रक्रियेवरून विद्यार्थ्यांमध्ये रोष

file photo
file photo

नागपूर : राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाचे प्रवेश 28 ऑगस्टपर्यंत थांबविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. मात्र, सातत्याने उशीर होत असलेल्या प्रक्रियेवर विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी आता सोशल मीडियावर राज्य सरकारविरोधात मोहीम सुरू केली आहे.
राज्यात दीड महिना उशिरा एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. पहिल्या फेरीत बोगस गुणांच्या आधारे एमबीए प्रवेश मिळविल्याचा प्रकार दुसरी गुणवत्ता यादी प्रकाशित होताच लक्षात आला. यामुळे प्रक्रिया थांबविण्याचे आदेश सीईटी सेलमार्फत देण्यात आले. दुसरीकडे जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटशी जुळलेल्या प्रकरणात गुणवत्ता यादी प्रकाशित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. यानंतर बरेच दिवस प्रक्रिया थांबल्यावर उच्च न्यायालयाने पुन्हा नव्याने प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले.
प्रक्रिया सुरू होत नाही तोच प्रथम फेरीतील नोंदणी केल्यानंतर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट प्रकरणातील विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने प्रक्रियेवर पुन्हा गंडांतर आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. याबद्दल दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांना मेल करून प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय दोन महिन्यांपासून प्रक्रियेत उत्पन्न होणाऱ्या घोळामुळे इंटर्नशिप आणि प्रशिक्षणाला मुकावे लागणार काय? अशी भीती विद्यार्थ्यांना वाटू लागली आहे. सत्र लांबल्याने रोजगार हिरावण्याचीही भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. दुसरीकडे प्रक्रियेस उशीर होत असल्याने यावर्षी एमबीएच्या प्रवेशात घट होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com