भंडारा जिल्हा परिषद नोकरभरतीत गैरव्यवहार करणाऱ्यांचे पितळ पडले उघड

Bhandara zilla parishad
Bhandara zilla parishad

भंडारा : सर्वोच्च न्यायालयाच्या 6 जुलै 2017 च्या निर्णयानुसार गट "क' व गट "ड' अनुसूचित जमाती प्रवर्गाची सरळसेवा नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात लेखी परीक्षेत घोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रकरणी चार उमेदवारांसह परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित लेखी परीक्षा रद्द करून परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना आला संशय

भंडारा जिल्हा परिषदेने सरळसेवा भरती अंतर्गत जाहिरात प्रकाशित करून अंगणवाडी पर्यवेक्षिका व कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले. 12 जानेवारीला मुंबई येथील एस.एम.बी. प्रा. लिमिटेड एजन्सीद्वारे उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. यात अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी 341 व कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा) पदासाठी 121 उमेदवारांनी परीक्षा दिली. उत्तरपत्रिका तपासणी सुरू असताना दोन्ही पदांच्या काही उमेदवारांना 200 पैकी 190, 186, 178 असे गुण मिळाले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी उमेदवारांना प्रत्यक्ष बोलावून शहानिशा केली. दरम्यान, परीक्षेत घोळ झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चौकशी केली असता, परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी उत्तरपत्रिकेत अदलाबदल केल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार व्हिडिओ चित्रीकरणात उघडकीस आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी बुधवारी (ता. 15) पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी चार उमेदवारांसह एसएमबी प्रा. लिमिटेड एजन्सीचे कर्मचारी सागर उंबरकर, पवार, शुभम राऊत व अन्य एकावर गुन्हा दाखल केला. 

असे आले प्रकरण उघडकीस 

सरळसेवा नोकरभरती समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या सहकार्याने निवडप्रक्रिया राबविण्यात येत होती. दोन्ही पदांसाठी लेखी परीक्षेचा पेपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: काढला. या पेपरमध्ये उमेदवारांना कमाल 140 ते 150 गुण मिळण्याची शक्‍यता होती. मात्र, कनिष्ठ अभियंता पदाच्या काही उमेदवारांना 190 तर अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाच्या उमेदवारांना 186 गुण मिळाल्याने लेखी परीक्षेत घोळ झाल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा संशय बळाविला. त्यांनी व्हिडीओ चित्रीकरण बघितले. यात एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी उत्तरपत्रिकेत अदलाबदल केल्याचे निदर्शनास येताच त्यांनी उत्तरपत्रिकेतील पर्यवेक्षकाची स्वाक्षरी तपासली. यात स्वाक्षरी बदललेली होती. यानंतर कमाल गुण मिळालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष बोलावून उत्तरांची शहानिशा केली. मात्र, त्यांना उत्तर सांगता न आल्याने घोळ झाल्याचे निष्पन्न होऊन लेखी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला. परीक्षा घेणाऱ्या एसएमबी प्रा. लि. एजन्सीला काळ्या यादीत टाकत सदर चारही उमेदवारांना भरतीप्रक्रियेतून निलंबित करण्यात आले आहे. 

मोठे मासे गळाला लागण्याची शक्‍यता 

सदर भरतीप्रक्रियेत झालेल्या घोळप्रकरणी एजन्सीच्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यात जिल्हा परिषदेचे अधिकाऱ्यांवर संशयाची सूई जात आहे. चौकशीअंती मोठे मासे गळाला लागण्याची शक्‍यता आहे. उत्तरप्रत्रिकेची अदलाबदल एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी केली असली तरी कुणा अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून केली, हा प्रश्‍न अजूनही अनुत्तरीत असून चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


सरळसेवा नोकरभरतीत घोळ लक्षात येताच लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. लवकरच परत परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. सदर एजन्सीने गडचिरोली, वर्धा, गोंदिया व चंद्रपूर येथेही परीक्षा घेतली आहे. यामुळे तेथेही काही गैरप्रकार केला काय? याची शहानिशा सुरू आहे. सदर एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तसेच चार उमेदवारांना भरतीप्रक्रियेतून निलंबित केले आहे. प्रकरणी भंडारा पोलिसात तक्रार केली असून पोलिस तपास करीत आहेत. 
- एम. जे. प्रदीपचंद्रन 
जिल्हाधिकारी तथा भरती प्रक्रिया समिती अध्यक्ष.
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com