वडकी, (जि. यवतमाळ) : सध्या टाळेबंदीमुळे लोकांकडे भरपूर वेळ आहे. त्याचा अनेक जण आपल्या आवडीप्रमाणे उपयोग करतात. अशातच गावातील एका तरुणाला मासे पकडण्याचा मोह झाला. मात्र तिथे काळ दबा धरून बसला होता आणि त्याने नेमका डाव साधला. राळेगाव तालुक्यातील आपटी येथील तलावामध्ये आज दुपारच्या सुमारास मासे पकडण्यासाठी गेला असता एकाचा मृत्यू झाला. सर्वत्र लाकडाऊन व हाताला काम नसल्यामुळे तालुक्यातील आपटी येथील संदीप धुर्वे पंचवीस वर्षे वयाचा व्यक्ती मासे पकडण्याचा मोह न आवरल्यामुळे आज दुपारच्या सुमारास गावातीलच दोन मित्रांना घेऊन येथील तलावामध्ये मासे पकडण्यासाठी गेला होता. दोन मित्र तलावाच्या एका बाजूला व संदीप दुसऱ्या बाजूला मासे पकडत होते. त्यातच तलावाच्या काठावर असल्यामुळे संदीपचा पाय घसरला व तो पाण्यामध्ये बुडाला ही बाब मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी पाणी जास्त असल्यामुळे त्याला पाण्याबाहेर काढण्याचे धाडस केले नाही.
त्यांनी ही बाब गावामध्ये येऊन सांगितली. त्यानंतर झाडगावचे पोलिस पाटील प्रशांत वाणी शशीमोहन पिंपरे तसेच गावातील लोक तलावावर गेले तोपर्यंत संदीप धुर्वेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी मृतदेह तलावा बाहेर काढून उत्तरीय तपासणी साठी राळेगाव येथे पाठविला.