
शेगाव : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात येणाऱ्या एकफळ या गावातील तरुणांना सध्या लग्नाची चिंता सतावत आहे. या गावातील फक्त मुलींना स्थळ चालून येत असली तरी तरुणांना स्थळ घेऊन येणाऱ्यांच्या रस्त्याकडे डोळे लावून बसावे लागत आहे. गावाला रस्ताच नसल्याने लग्नासाठी मुलगी देण्याचे धाडस कुठल्याही मुलीच्या पित्याने दाखवलेले नाही. यामुळे या गावातील ४० ते ५० तरुण आजही अविवाहित आहेत.
दुसरीकडे गावातील महिला, शाळकरी मुले, चाकरमानी यांना रोज भाकरीच्या लढाईसाठी दररोज जीवघेणा प्रवास करत आहेत. जीव मुठीत धरून रेल्वे रुळावरून ये-जा करावे लागत असल्याने ग्रामवासी त्रस्त झालेले आहेत. मात्र वर्षनुवर्षापसून या गावकऱ्यांची हाक ऐकायला कुणीही तयार नसल्याचे दिसू येत आहे.रास्ता नसल्याने रेल्वे रुळावरून जातांना एखादी दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पाहूया एकफळ वासियांचा जीवघेणा प्रवास आणि त्यांच्या समस्यांचा विशेष वृतान्त.
बुलडाणा जिल्ह्यातील केवळ ५०० लोकसंख्या असलेले एकफळ हे गाव शेगावपासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. अंतर कमी असले तरी, येथील ग्रामस्थांना शेगावात पोहोचण्यासाठी किमान दोन तास लागतात. ग्रामस्थांना अळसणा मार्गे शेगावला जावे लागते; मात्र अळसणा गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नाही. तीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम मंजूर झाले असून, काही जमिनींच्या दानपत्रामुळे हे काम अडकले आहे.
त्यामुळे ग्रामस्थांना रेल्वे पुलाला लागून असलेल्या बिकट रस्त्याने अळसणापर्यंत पायी जावे लागते. सध्या पावसाळय़ात या रस्त्यावर कंबरेएवढे पाणी साचते आणि आहे तो रस्ताही बंद होतो. ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनाही जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून जावे लागते. येथील नागरिकांना १ कि.मी चा रेल्वे रुळावरील प्रवास करतांना साक्षात देव आठवतो कारण पुलावरुन जात असतांना समोरुन किंवा मागुन रेल्वे गाडी आली तर उंच रुळावरून उडी मारणे किंवा रेल्वे खाली येणे या शिवाय कुठलाही पर्याय त्यांच्या समोर नसतो.
या गावात रात्री बेरात्री प्रसुतीसाठी किंवा रुग्ण असले कि बैलगाडी किंवा खाटेवर टाकुन शेगावला आणत असतांना संपुर्ण गावकर्यांना तारेवरची कसरत करावी लागते. यापुर्वीही रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचविण्यासाठी खांद्यावर बसवुन रुग्णालया पर्यंत न्यावे लागले. रस्त्याअभावी शिक्षणाची स्थितीही गंभीर आहे. पाऊस आला की, त्यादिवशी शाळेला दांडी मारण्याशिवाय पर्याय नसतो. कारण विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात रुग्णालय नाही, शाळा आहे ती चवथीपर्यंतच, अंतर्गत रस्ते नाहीत आणि नाल्याही नाहीत. हे गाव वसल्यापासून मूलभूत सेवा सुविधांपासून वंचितच राहिली. या गावात जाण्यासाठी आजही कोणताच रस्ता नाही, यामुळे येथील लोकांना ये-जा करण्यासाठी रोज आपल्या जीवाची बाजी लावावी लागते.
आतापर्यंत या गावातील अनेक गावकरी या पुलांचे बळी ठरले आहेत. पण आजतगायत गावासाठी कोणतीही सोय प्रशासनातर्फे करण्यात आली नाही. गावातील समस्या इथेच संपत नाहीत. सर्वात महत्वाची समस्या म्हणजे लग्नासाठी मुलगी देण्याचे कुणी धाडस करत नाही. गाव सोडून जर कुणी तरुण राहायला तयार झाला तरच त्याचे लग्न होते. पण प्रपंचाची नाळ गावाशी जोडली असल्याने आणि आर्थिक गणित जुळत नसल्याने तरुणही गावाबाहेर जाऊ शकत नाहीत. यामुळे त्यांचे लग्न होत नाही. आज गावातील तरुण लग्नापासून वंचित होत चालले आहेत. अनेकांचे लग्नाचे वय निघून गेले आहे. पण येणाऱ्या तरुणांची तरी लग्न व्हावीत, गावात लोकांनी लग्नासाठी मुली द्याव्यात यासाठी रस्ता व्हावा म्हणून येथील तरुण शासनाच्या दारी चकरा मारीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.