पुरुषांना मिळाला ‘भरोसा’; कौटुंबिक वादातून घेताहेत धाव

file photo
file photo

चंद्रपूर : महिला तक्रार निवारण केंद्रातून कौटुंबिक वाद, ज्येष्ठ नागरिक, तरुण मुलींच्या समस्या सोडविल्या जात होत्या. पीडित महिला या केंद्रात धाव घेऊन तक्रारी दाखल करायच्या. महिलांना पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल करण्याची मुभा होती. परंतु, पुरुषांच्या तक्रारी पोलिस ठाण्यात स्वीकारल्या जात नव्हत्या. त्यामुळे अनेक पुरुषांना तोंड दाबून बुक्‍यांचा मार सहन करावा लागत होता. आता या केंद्राचे नाव भरोसा सेल झाल्यानंतर पुरुषांना ‘भरोसा’ मिळाला आहे. त्यामुळे महिलांप्रमाणेच पुरुषही आता या केंद्राकडे कौटुंबिक वादाच्या तक्रारी दाखल करू लागले आहेत.


समाजात शांतता, सुव्यवस्था नांदावी म्हणून पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळेच अनेक जण तक्रारी नोंदविण्यासाठी हक्काने ठाण्यात धाव घेत असतात. परंतु, कौटुंबिक वाद, ज्येष्ठ नागरिक, तरुण मुलींच्या समस्या सोडविण्याच्या उद्देशातून महिला तक्रार निवारण केंद्राची स्वतंत्र स्थापना करण्यात आली. त्यानंतर पीडित महिलांना तक्रारी दाखल करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध झाली. तसेच पोलिस ठाण्यात कौटुंबिक वादाच्या दाखल तक्रारीसुद्धा याच केंद्राकडे पाठविल्या जात होत्या. त्यानंतर संबंधित तक्रारकर्त्या पीडित महिला, पुरुषांचे तीन ते चारवेळा समूपदेशन केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जात होता.

मात्र, यासर्व प्रक्रियेत पीडित पुरुष कुठेच धाव घेऊ शकत नव्हता. केवळ या केंद्राद्वारे बोलाविण्यात आलेल्या चौकशीसाठी त्याला उपस्थित राहावे लागत होते. मात्र, शासनाने कार्यप्रणालीत काही प्रमाणात बदल करीत या केंद्राचे नाव भरोसा सेल केले आहे. त्यानंतर या केंद्राकडे कौटुंबिक वादाच्या तक्रारी करण्याची महिलांप्रमाणेच पुरुषांनाही संधी देण्यात आली. पोलिस ठाण्यात तक्रारी नाकारल्या गेल्याने अनेक दिवस तोंड दाबून बुक्‍यांचा मार खाणाऱ्या नागरिकांना आता न्यायासाठी हे केंद्र उपलब्ध झाले आहे. त्यामुळेच मागील काही वर्षांत पीडित महिलांप्रमाणेच पुरुषही मोठ्या प्रमाणात तक्रारीसाठी या केंद्रात धाव घेत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

तरुण मुलींना विवाहपूर्व समुपदेशन
तरुण मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे समाजात उघडकीस येत आहेत. यानंतरही अनेक युवक-युवती प्रेमानंतर लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे पसंद करीत असतात. परंतु, भविष्यात फसवणूक झाली. शारीरिक, मानसिक छळ झाला. अत्याचार झाला, अशा तक्रारी समोर येतात. या सर्व तक्रारी होऊ नये म्हणून या केंद्राच्या माध्यमातून तरुण मुलींचे विवाहपूर्व समुपदेशन केले जाते.
 

महिला तक्रार निवारण केंद्र आता भरोसा सेल झाले आहे. या केंद्रात आता पीडित महिलांप्रमाणेच पुरुषांच्याही तक्रारी स्वीकारल्या जातात. त्यामुळे पुरुषसुद्धा मोठ्या संख्येने तक्रारी करण्यासाठी येथे येत असतात. या केंद्राच्या माध्यमातून पुरुषांना भरोसा मिळाला आहे.
-प्रभावती एकुरके, सहायक पोलिस निरीक्षक, भरोसा सेल, चंद्रपूर.
 

संपादन : मेघराज मेश्राम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com