कोरोनाने केला राजुऱ्याच्या बैलबाजारातील घुंगरांचा आवाजही बंद 

Bull Market
Bull Market

वरुड (जि. अमरावती)  : छम छम वाजणाऱ्या घुंगरांचा आवाज, दुपट्ट्यात हात घालून बोटांच्या हालचालींवर होणारे व्यवहार, तीस हजारांपासून एक ते दीड लाखांपर्यंत लागणारी बैलजोडींची बोली, असे सारेकाही सुने सुने झाले आहे. तब्बल 70 वर्षांचा इतिहास असलेला राजुराबाजार येथील इंग्रजकालीन बैलबाजार कोरोनामुळे शांत झाला आहे. 

विदर्भातील प्रसिद्ध सर्वांत मोठा बैलबाजार म्हणून राजुराबाजार येथील या बाजाराची ख्याती आहे. येथील बैलबाजार विविध जातींच्या बैलांसाठी प्रसिद्ध आहे. लगतच्या नागपूर, वर्धा जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील पांढुर्णा, मुलताई इत्यादी ठिकाणांवरून या ठिकाणी बैल विक्रीसाठी तसेच शेतकरी, व्यापारी खरेदीसाठी येतात. 30-35 हजारांपासून एक ते सव्वा लाखापर्यंतची बैलजोडी या बाजारात विक्रीसाठी येते. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने गुरांच्या या बाजारात हजेरी लावतात. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा वैभवशाली परंपरा जोपासून गेल्या 70 वर्षांपासून हा बाजार नित्यनेमाने भरतो. मात्र, या बाजारालाही कोरोनाची नजर लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हो बाजार सुनासुना झाला आहे. दिवसभर जनावरांच्या विक्रीमुळे गजबजणारा हा बाजार आता शांत आहे. ना गुरांच्या हंबरण्याचा आवाज, ना गळ्यातील घुंगरांचा किणकिणाट, सारेकाही कोरोनामुळे लॉकडाउन झाले आहे. 

शेतीचे मोठे नुकसान होणार

बैलबाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आहे. मशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. अशावेळी बहुतेक शेतकरी बैल खरेदी करतात. या दोन सवंगड्यांच्या साथीनं हिरवं शिवार फुलवतात. यंदा मात्र शेतकऱ्यांना बैल मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी यंदाची मशागत यंत्राच्या साहाय्यानेच करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. बैलजोड्यांची संख्या कमी असल्याने आता पुढील नियोजन, वखरणी, पेरणी, डवरणीसारखी कामे करताना अडचणी येणार आहेत. वेळेच्या आत ही कामे झाली नाही तर शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. शिवाय आर्थिक भारही सहन करावा लागणार तो वेगळा. त्यामुळे बळीराजाची चिंता अधिकच वाढलेली दिसून येते. 

शासकीय आदेशानुसार बाजार बंद करण्यात आला आहे. शेतीच्या मशागतीसाठी बैलांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र, बाजार बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. बाजार सुरू करण्याचे आदेश येताच पूर्ववत सुरू होईल. 
- नंदकिशोर बोडखे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, वरुड. 

खरिपाच्या मशागतीसाठी बैलाची गरज असते. मात्र, यावर्षी बाजार बंद असल्याने बैल मिळत नाही. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. शिवाय बैलजोड्यांची किंमतही वाढली आहे. खरीप हंगामावर याचा परिणाम होईल. बैलजोड्यांची संख्या घटल्याने पेरणी व डवरणीवर परिणाम होईल. 
- सुनील गावंडे, शेतकरी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com