सोयाबीनचे बियाणे "वांझ' निघाल्याने दुबार पेरणीचे संकट 

file photo
file photo

यवतमाळ : शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगविलेच नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून येत आहेत. अनेक कंपन्यांच्या विविध वाणांच्या बियाण्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे पेरणी करूनही उगवण झाली नाही, असे क्षेत्र 20 हजार हेक्‍टरच्या जवळपास असण्याचा अंदाज कृषी विभागाचा असून तक्रार आलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झाले आहेत. 

 'सकाळ'ने 'सोयाबीन बियाणे निघाले वांझ' या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष याकडे वेधले. शेतकरी नेते देवानंद पवार प्रत्यक्ष मोका पाहणी करून वास्तव उजागर केले. जिल्ह्यातील हजारो हेक्‍टरवरील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्याचे आता समोर आले आहे. प्रत्यक्षात कृषी विभागाकडूनच याला दुजोरा मिळाला आहे. तर, कृषी आयुक्तालयाने ही बाब अतिशय गंभीरपणे घेतली आहे. जिल्हा प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी नेते देवानंद पवार यांनी केली आहे. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना मोठा झटका बसला आहे. चांगल्या उत्पन्नाच्या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. मात्र, जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणेच 'वांझ' निघाले आहेत. तशा तक्रारी आता कृषी विभागाला प्राप्त होत आहेत. जिल्हाभरात सर्वच भागातून तक्रारीचा पाऊस आता सुरू झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना एका मोठ्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. गेल्या हंगामात अवकाळी पावसाने सोयाबीनला फटका बसला होता. ऐन सोयाबीन निघण्याच्या वेळी अवकाळी पावसाने पीक उद्‌ध्वस्त केले होते. त्यामुळे दर्जेदार सोयाबीन फार कमी प्रमाणात पेरणी साठी उपलब्ध होते. मागणीत वाढ झाल्याने अनेक कंपन्या बाजारात उतरल्या. काहींना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळाले, तर काहींना मिळाले नाही. शेतकऱ्यांनी पावसाचा वेध घेत पेरणी केली. मात्र, आता ही पेरणीच उलटली आहे. सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याने आता शेतकऱ्यांसमोर आणखी मोठे आव्हान उभे झाले आहे. आधीच अडचणीत असलेला शेतकरी या नव्या संकटाने आणखी अडचणीत आले आहेत. जिल्हाभरातून तक्रारी येत असल्याने साधारणतः: वीस हजार हेक्‍टरवर उगवण झाली नसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिवाय, बियाण्याची सॅम्पल तपासणीसाठी पाठविले जाणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या माती "वांझ' बियाणे मारले आहे. हे तक्रारीनंतरच स्पष्ट होणार आहे. 

'बियाणे उगविले नसल्याने शेतकऱ्यांनी पंचायत समिती तसेच कृषी कार्यालयात अर्ज करायचा आहे. त्यांचे पंचनामे करण्यात येणार असून बियाण्याचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविले जाणार आहे.' 
-पंकज बरडे,कृषी विकास अधिकारी, यवतमाळ 

हे वाचा— नागपुरातील गांधीबाग, भोईपुरा, नरसाळ्यातील परिसर सील

बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन पिकावर फिरविला नांगर 
झरी जामणी (यवतमाळ) : अल्प मुदती व हुकमी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन लावत आहे. यंदा कापूस खरेदीचे वांदे झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. मात्र, बियाणे कंपन्यांनी बनावट बियाणे माथी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. तालुक्‍यातील कोसारा येथील संदीप गोडे या शेतकऱ्याने सोयाबीन पिकावर नांगर फिरवून दुबार पेरणीला सुरूवात केली आहे. तर, काही शेतकरी सोयाबीनऐवजी कापसाची टोबणी करीत आहेत. सरकारमान्य कंपनीकडून कंपन्यांचे प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले. मात्र, पेरणीनंतर ते उगवलेच नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. दुबार पेरणी करायची ठरविली तरी पुन्हा कोणते बियाणे वापरायचे, त्याच्या उगवणक्षमतेची शाश्वती काय, बियाणे तपासण्यासाठी वेळही शिल्लक नाही, त्यामुळे खरीप हंगाम हातचा जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे काही शेतकरी कापसाची टोबणी करताना दिसत आहे. कृषी सेवा केंद्रांतील विक्रेते शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळे चांगलेच हैराण झाले आहेत. कंपन्यांनी या संबंधी तातडीने शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक वाढण्याची दाट शक्‍यता आहे. 

पाऊस चांगला झालेल्या भागातही सोयाबीन बियाणे उगवले नाही. बनावट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने हे घडले आहे. कृषी विभाग सरासरी 100 मिमी पाऊस न पडल्याने पेरण्या उलटल्याने सांगत आहे. मग, त्याच परिसरात कपाशीची पेरणी कशी साधली, या प्रश्‍नाचे उत्तर कृषी विभागाने द्यावे. बनावट बियाण्यानेच शेतकऱ्यांचा घात केला असून कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी.' 
-संदीप बुर्रेवार, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, झरी. 

गेल्या वर्षीचे सोयाबीन पाण्यात सापडल्याने ते खराब झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारमान्य कंपन्यांकडूनच सोयाबीन बियाणे खरेदी केले. वर्षानुवर्षे बियाणे विकणाऱ्या कंपन्यांनी या वर्षी सोयाबीन बियाण्यांची गुणवत्तेविषयी काळजी घेतली नाही. त्यामुळे सोयाबीन बियाण्याची उगवण झाली नाही. कंपनीने नुकसानभरपाई द्यावी.' 
-विशाल ठाकरे, शेतकरी, खातेरा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com