नागपूर : सध्या दीक्षाभूमीवर सुरू असलेली विकास कामे ही राज्य सरकारच्या नाही तर दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनतर्फे मिळालेल्या निधीवर सुरू आहेत. मात्र चार वर्षांपूर्वी दीक्षाभूमीच्या विकासासाठी 350 कोटींचा निधी मंजूर केला होता. यातील 40 कोटी तातडीने देण्यात येतील अशी घोषणा केली. तरीही चार वर्षांपासून दीक्षाभूमी या निधीपासून वंचित आहे. साडेतीनशे कोटींचे केवळ आश्वासन मिळाले, निधी मिळाला नाही, अशी खंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सदस्य डॉ. सुधीर फुलझेले यांनी आज येथे व्यक्त केली.दीक्षाभूमीवर होणाऱ्या 63 व्या धम्मदीक्षा सोहळ्याच्या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. फुलझेले यांनी ही नाराजी व्यक्त केली. नागपूर सुधार प्रन्यास दीक्षाभूमीच्या या कामाची नोडल एजन्सी होती. परंतु एकाही कामाच्या निविदा त्यांनी काढल्या नाहीत. स्मारकाचे जे विकास काम सुरू आहे, डॉ. आंबेडकर फाउंडेशनतर्फे मंजूर झालेल्या 9 कोटी 40 लाखांतून होत आहे. हे काम पूर्ण होण्यास दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागेल, असेही ते म्हणाले. स्मारकावरील काच काढून त्यात आतील भागाची दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे. ऊन-वारा-पाऊस झेलत असल्यामुळे येथील "टाइल्स' काढल्या आहेत. यावर रासायनिक प्रक्रिया केल्यांतर पुन्हा टाइल्स् व त्यावर काचेचे आवरण लावण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. याला दीड वर्ष लागेल. दरम्यान, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी मात्र दीक्षाभूमीच्या विकासाचे प्रकरण हाय पॉवर कमिटीकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती यावेळी दिली.
दानपेटीत 50 लाखांचा निधी
दीक्षाभूमीच्या विकासकामासाठी तीन वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी आला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी व नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती पदाचा कारभार एकाच व्यक्तीकडे असल्याने तत्काळ नासुप्रकडे हस्तांतरीत करण्यात आले होते, याकडे डॉ. फुलझेले यांनी लक्ष वेधले. तर गतवर्षीच्या तुलनेत यवर्षी दीक्षाभूमीच्या दानपेटीतील निधीत वाढ झाली. 50 लाखांचा निधी गोळा झाला आहे, अशी माहिती येथे देण्यात आली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.