नागपूर : विधानसभेत पराभूत झालेले जे उमेदवार पाच वर्षे मतदार व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले नाहीत त्यांना तसेच मतदारसंघ बदलवून मागणाऱ्या उमेदवारांना आता पुन्हा कुठलीच जबाबदारी पक्षाने देऊ नये, असा ठराव शहर कॉंग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला. हा ठराव प्रदेश कमिटीने मान्य केल्यास शहरातील अनेक दिग्गज नेते अडचणीत येऊ शकतात.
रविवारी शहर कॉंग्रेसची बैठक घेण्यात आली. त्यात उपरोक्त ठराव घेण्यात आला. पाच वर्षे पक्षात सक्रिय नसलेल्या आणि जनतेशी कुठलाच संबंध ठेवला नसल्याने अनेक भागांत पक्ष कमजोर झाला आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही अनेक नेते सक्रिय नव्हते. आता विधानसभेची निवडणूक येताच ते उमेदवारीसाठी खटाटोप करीत आहेत. काहींना मतदारसंघही बदलवून पाहिजे आहे, असे ठरावात म्हटले आहे.
शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. बैठकीला प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, प्रशांत धवड, डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभूर्णे, संदेश सिंगलकर, नगरसेवक रमेश पुणेकर, संदीप सहारे, मनोज सागोंळे, नितीन साठवणे, रश्मी धुर्वे, रेखा बाराहाते, इरशाद अली, पंकज लोणारे, विवेक निकोसे, श्रीकांत ढोलके, प्रवीण गवरे, धरम पाटील, किशोर गजभिये, ऍड. अक्षय समर्थ, प्रशांत धवड दिनेश बानाबाकोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. |
|