चिखलापारला पाण्याचा विळखा

File photo
File photo

चिमूर  : चिमूर तालुक्‍यात मागील चोवीस तासांत आलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब भरले आहे. त्यामुळे शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावरील 195 लोकवस्तीचे चिखलपार गाव पाण्याने वेढले गेले. गावकऱ्यांना प्रशासनाने चिमूर येथील शेतकरी भवनात हलविले. सावरगाव येथील दोन तलाव ओव्हरफ्लो झाले आहे. ते फुटण्याची भीती गावकऱ्यांमध्ये आहे.
मुसळधार पाऊस झाला की, चिखलापारला बेटाचे स्वरूप येते. अशावेळी गावातून निघण्यासाठी कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही. त्यामुळे रविवारला गावाला पाण्याचा विळखा बसताच उपविभागीय अधिकारी भय्यासाहेब बेहरे यांनी गावकऱ्यांची समजूत काढून त्यांना गावाबाहेर काढले. गावकरी सध्या चिमुरातील शेतकरी भवनात आहे. चिमूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष तुषार शिंदे यांचे ट्रॅक्‍टर आणि शासकीय वाहनाने चिमुरात आणले. गावकऱ्यांच्या राहण्याची, भोजनाची आणि औषधांची व्यवस्था येथे केली आहे. संततधार पावसामुळे चिमूरपासून हिंगणघाट, वर्धा, पिर्परडा, सिंदेवाही, पिपळनेरी, भिसी, खडसंगी, मूरपार या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक नदी, नाल्यांना धोक्‍याची पातळी गाठली आहे. त्यामुळे चिमूर आगारातील अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. चिमूर तालुक्‍यात खडसंगीवरून मुरपारकडे जाणारा खोडदा नाला दुथडी भरून वाहत आहे. यात वेकोलिच्या कोळसा खाणीत गेलेले कामगार अडकून पडले आहे. या मार्गाने वाहतूक बंद आहे.
संततधार पावसाने सिंदेवाही आणि नागभीड तालुक्‍यांतील जनजीवन विस्कळित झाले आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. शेतात पाणी घुसल्याने शेकडो हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नागभीड -बाळापूरकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. तसेच बनवाही- मोहाडी, मांगली - ब्रामणी रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच तेलीमेंढा येथील भामाबाई सतीबावणे यांचे घर भुईसपाट झालेले आहे. नागभीड येथील प्रभाग क्र. 6 मधील चंद्रशेखर चन्ने यांचे घर कोसळले आहे. नागभीड शहरातील राममंदिर चौकात रस्त्यावर पाणी साचलेले आहे. बोथली येथील संपूर्ण शेती पाण्यासाठी आली आहे. नवखड्याच्या तलावाच्या पाळीवरून पाणी जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंदेवाही तालुक्‍यातील नवरगाव येथील वॉर्ड क्रमांक पाचमधील नामदेव दादाजी घरत व महादेव दादाजी घरत यांचे घर कोसळले. तलाठ्याने पडलेल्या घराचा पंचनामा केला आहे.

घोडाझरीत प्रवेश बंद
अतिवृष्टीमुळे घोडाझरी तलावाने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून घोडाझरीचे प्रवेशद्वार बंद केले आहे. "ओव्हरफ्लो' झाल्यामुळे किटाळी, बोरमाळा या गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच चिंधीचक, ओवाळा येथील संपूर्ण शेत घोडाझरी ओव्हरफ्लोमुळे बुडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com