या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता कर्जमुक्तीची प्रतीक्षा...विविध अडचणींमुळे आली बाधा

file photo
file photo

यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू झाले आहे. यासोबत तक्रारीची संख्याही वाढत आहे. आधार क्रमांक बदलणे, वारसाची नोंदणी, पुनर्गठन करताना सही नसणे, कर्जमाफीची रक्कम अशा स्वरूपाच्या जवळपास आठशे तक्रारी सहकार विभागाकडे आल्या आहेत. या तक्रारी जिल्हास्तरीय समितीपुढे ठेवल्या जाणार असून, त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन करण्यात आले होते. त्याचा परिणाम राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेवरही झाला आहे. अनेक महिन्यांपासून घोषणा होऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. खरीप हंगामाची पेरणी झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. आता "अनलॉक'ची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शासकीय कामांनाही गती मिळाली आहे. कर्जमाफी योजनेचे काम सुरू झाले आहे. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरू झाले आहे. यासोबत शेतकऱ्यांच्या तक्रारीची संख्याही वाढत आहे.

शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बदलले

कर्जमाफीसंदर्भात आतापर्यंत जिल्हाभरातून आठशेच्यावर शेतकऱ्यांनी सहकार विभागाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बदलले आहेत. काहींच्या फार्मवर वारसाचे नाव नाही, तर ज्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले, अशांची सही त्यासाठी नाही. याशिवाय, काहींच्या रकमेत तफावत आहे. अशा नानाविध प्रकारच्या तक्रारी सहकार विभागाकडे येत आहेत. कर्जमुक्तीसाठी प्रमाणीकरणचे काम वेगात सुरू आहे. सद्यःस्थितीत केवळ नऊ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे. दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मदतीला सुरुवात होणार आहे.

कर्जमाफीवर शिक्कामोर्तब होणार

असे असले तरी ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. अशांची सुनावणी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीसमोर होणार आहे. याठिकाणी संबंधित शेतकऱ्यांना पुराव्यानिशी आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर दुरुस्ती होऊन संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. लवकरच जिल्हास्तरीय समितीची बैठक होणार असून कर्जमाफीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

जिल्हा बॅंकेची प्रक्रिया उद्यापासून

जिल्ह्याला 745 कोटींची कर्जमाफी झाली आहे. यातील 710 कोटींचा निधी दिला जाणार आहे. सध्या जिल्ह्याला 145 कोटी रुपये प्राप्त झाले आहे. यातील 71 कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला दिले आहेत. जिल्हा बॅंकेची प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून गुरुवार (ता.नऊ) पासून प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. तर उर्वरित रक्कम इतर बॅंकांची असून त्यांची प्रक्रियाही लवकरच सुरू होण्याची शक्‍यता आहे.


लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे
जिल्ह्याला निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा बॅंकेची बुधवारी (ता. 8) बैठक झाली. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यांची सोडवणूक जिल्हास्तरीय समितीसमोर केली जाईल.
- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com