खनिजाची लालसा उठली लोकांच्या जीवावर! आठवड्याभरात बारा जणांचा मृत्यू!

drown
drown

अमरावती : पाणी हेच जीवन असते असे मानले जाते. मात्र, निसर्गाशी खेळ केल्याने त्याचे किती भीषण परिणाम होऊ शकतात हे गेल्या आठवड्याभरापासून अमरावतीकर अनुभवत आहेत. गौण खनिजाच्या लालसेपोटी नदीपात्रात करण्यात आलेले खोदकाम या सात दिवसांत तब्बल १२ जणांच्या जिवावर बेतले आहे. विशेष म्हणजे या गंभीर बाबीची दखल अद्यापही कोणीच घेतली नसल्याची चिंताजनक स्थिती आहे.

नदीपात्रात करण्यात आलेल्या खोदकामामुळे प्रचंड पाणी त्यात साचले असून त्याठिकाणी या लोकांचे जीव गेले. कुठे पितापुत्र तर कुठे मुलांसह आईला जीव गमवावा लागला. एकीकडे नदी-नाल्यांच्या खोलीकरणाच्या माध्यमाने जलसाठा वाढविण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, दुसरीकडे प्रमाणापेक्षा जास्त खोदकाम तसेच तेसुद्धा गावांना लागून करण्यात आल्याने त्याचे भीषण परिणाम पुढे येत आहेत.

अंजनगावसुर्जीच्या शहानूर नदीपात्रात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यावर अंजनगावबारी येथेसुद्धा अशीच घटना घडली. याठिकाणी केवळ शेततळ्याने दोघांचा जीव घेतला. असदपूर नजीकच्या निंभारी गावाजवळ बाप-लेकाचा बुडून मृत्यू झाला. धामणगावरेल्वे येथे तीन मुले बुडाली व आई त्यांना वाचविण्यासाठी गेली असता तिचासुद्धा मृत्यू झाला. महामार्गाच्या कामासाठी करण्यात आलेले अतिरिक्त खोदकाम या मुलांच्या तसेच त्यांच्या नातीच्या जिवावर उठले. अशा पद्धतीने खोदकाम करण्यात आल्यास त्याठिकाणी कुंपण लावून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे औचित्य संबंधित कंत्राटदार किंवा प्रशासकीय अधिकारी दाखवित नसल्याचे या घटनांवरून स्पष्ट होत आहे.

विशेष म्हणजे अशाप्रकारच्या गंभीर घटनांची मालिका सुरू असतानाही स्थानिक किंवा जिल्हा प्रशासनाकडून अथवा लोकप्रतिनिधींकडूनसुद्धा दखल घेतल्या जात नसल्याची गंभीर स्थिती आहे. भूगर्भाच्या उदरातील गौण खनीज किती प्रमाणात काढावे तसेच ते काढल्यावर काय उपाययोजना कराव्यात याचे भान संबंधित यंत्रणेला राहत नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहे. अमरावती जिल्ह्याच्या इतिहासात सातत्याने एकाच आठवड्यात तब्बल १२ जणांचे जीव गेल्याच्या घटना पहिल्यांदाच घडल्या आहेत. यावरून जीवनदान देणाऱ्या नद्यांची स्थिती धोकादायक झाल्याचे बोलले जात आहे.

निष्काळजीपणा कुणाचा?
पोहण्याचा मोह किंवा पुजेनंतरचे साहित्य विसर्जित करण्यासाठी नदीवर जाणाऱ्यांना त्यांची काळजी घेणे आवश्‍यक असल्याचा एक मतप्रवाह आहे. परंतु कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने खोदकाम करण्यात आले आहे व पावसाळा चांगला झाल्याने त्याठिकाणी कशा पद्धतीने पाणी साचेल आणि ते नागरिकच नव्हे तर जनावरांच्या जिवालासुद्धा धोकादायक ठरू शकते. ही बाब संबंधित यंत्रणेने लक्षात घेऊन तशा उपाययोजना करणेदेखील तेवढेच आवश्‍यक असल्याचे बोलले जात आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com